‘द केरला स्टोरी’ या वादग्रस्त चित्रपटाने देशाच्या राजकारणाचा पारा चढला आहे. भाजपाकडून या चित्रपटाचं जोरदार समर्थन होत आहे, तर विरोधकांकडून हा राजकीय स्वार्थासाठी द्वेष पसरवणारा चित्रपट असल्याची टीका होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी द केरला स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे, असं वक्तव्य केलं. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (१० मे) कार्यकर्त्यांबरोबर ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, “हा चित्रपट पाहिल्यावर मी एकच गोष्ट म्हणेन की, जे लोक या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिली पाहिजे असं बोलले त्यांच्या सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे, असं मी चित्रपट पाहिल्यावर म्हणेन.”

व्हिडीओ पाहा :

“कायदा सगळ्या गोष्टी करू शकेल असं नाही”

“कायदा आहे आणि तो कडक करावा लागेल. मात्र, त्याबरोबर समाजाचं एक जाळं तयार करावं लागेल. कारण कायदा सगळ्या गोष्टी करू शकेल असं नाही. म्हणून जागृकता आणणंही महत्त्वाचं आहे,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे”, जितेंद्र आव्हाड यांचं विधान; म्हणाले, “अधिकृत आकडा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे”

“मुलींचं शोषण करण्याचं षडयंत्र केलं जातं आहे. धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे. या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत. हा चित्रपट गोष्ट सांगण्यासाठी नाही, तर जागृत करण्यासाठी आहे. यानंतर कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये म्हणून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.