आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतल्या भाजपा कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी आपण भाजपात आलो कारण आपला तो व्यक्तिगत निर्णय होता असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसंच आदर्श घोटाळ्यांवरच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलं. याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की काँग्रेसचा आरोप हा आहे की भाजपाला फोडाफोडीशिवाय जिंकता येत नाही. या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनीही खास शैलीत उत्तर दिलं.

अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?

“आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आलं आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदं ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करत आहेत. मी सर्वात आधी भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती यांना अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आहे त्यावर सही करुन त्यांना भाजपात प्रवेश द्यावा.” देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगिल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना अर्ज दिला. जो भरुन त्यांना प्रवेश देण्यात आला.

काँग्रेसबाबत काय म्हणाले देवेंद फडणवीस?

भाजपाला फोडाफोडी केल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही असा आरोप काँग्रेसने केलाय याविषयी काय सांगाल ? हे विचारलं असता फडणवीस म्हणाले, “माझा त्यांच्यावर उलटा आरोप असा आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही. त्यांना (काँग्रेस) त्यांच्या पक्षातले नेते सांभाळता येत नाहीत. त्यांना त्यांच्या पक्षाची मोट बांधता येत नाही. कारण कुणाचा पायपोस कुणालाच नाही. सगळे मोठे उंचीचे नेते इतक्या वर्षांची त्यांची पुण्याई सोडून आमच्याबरोबर येत आहेत याचं कारण काँग्रेसमधलं वातावरण आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- Ashok Chavan Join BJP: “भाजपात आलो कारण..”, पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे

काँग्रेस पक्षात पक्ष कुठल्या दिशेला जातोय हेच कुणाला समजत नाही. भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करु लागलो हे काँग्रेसला कळलंही नाही. असं झाल्यानंतर जे सिझन्ड नेते आहेत ते जेव्हा दृष्टीक्षेप टाकतात तेव्हा त्यांना कळतं की आपण काय करतोय? नेतृत्व काय करतं आहे? त्यामुळे ते देशाच्या मुख्य विचारधारेत येतात. काँग्रेसने आधी आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही. ज्यांनी काँग्रेस मोठी केली हे आत्मचिंतन काँग्रेसने जरुर केलं पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.