लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. देशात एकूण सात टप्प्यांपैकी तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त खासदार आपल्याच पक्षाचे निवडून येतील, असा दावा केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात ३० ते ३५ जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा केला होता. शरद पवारांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत शरद पवारांना मिश्किल टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“सध्या सगळीकडे भारतीय जनता पार्टीमय असे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचे असे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चत आहे. आमचे विरोधक बावचळले असून ते वेगवेगळ्या प्रकारचा अजेंडा सेट करणे, वेगवेगळे विधाने करणे, षडयंत्र करणं असे प्रकार पाहायला मिळत आहेत. मात्र, त्यांनी काही केले तरी भाजपा जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे”, असे भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मनसेला शिवाजी पार्क येथील मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मैदानावरुन ठाकरे गट आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली होती. यानंतर अखेर हे मैदाना मनसेला मिळाले. यानंतर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर करण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडवणीस म्हणाले, “राज ठाकरे हे आमच्या महायुतीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे त्यांना मैदानाची परवानगी मिळाली तर त्यामध्ये चूक काय आहे, त्यांनी ते मैदाना बूक केले होते.”

हेही वाचा : लोकसभा निवडणूक जिहाद विरुद्ध विकास! गृहमंत्री अमित शहा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील. तर महायुतीला १३-१८ जागा मिळतील. असा दावा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. यावर आता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार यांनी महायुतीला १२-१३ जागा दिल्या. आरे बाप रे! पवार साहेबांचं किती उदार अंतकरण आहे”, असा मिश्किल टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला.

पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयासाठी विदर्भातील काँग्रेसचे काही नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. त्यामुळे काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसने साम, दाम, दंड , भेद अशी निती त्यांच्याकडून अवलंबवली जात आहे. मात्र, येत्या काळात काँग्रेस कोणत्याही थराला गेले तरी तरी जनता आमच्याबरोबर आहे”, असी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.