मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरावाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जालन्यातील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. तेथील उपोषणकर्त्यांशी स्वत:हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीरतेनं काम करत आहे. हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे एकादिवसात सुटणारा प्रश्न नाही. तो सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालले असल्याचं उपोषणकर्त्यांना सांगितलं होतं.”

“अधिकाऱ्यांसह १२ पोलीस जखमी”

“मात्र, आंदोलक उपोषण सोडवण्यासाठी तयार नसल्याने त्यांची तब्येत खालावत होती. कोणत्याही उपोषकर्त्याची तब्येत खालावत असेल, तर रूग्णालयात दाखल करण्यात यावं, ही सरकारची जबाबदारी आहे. उपोषकर्त्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी गुरूवारी प्रयत्न करण्यात आले. पण, उपोषकर्त्यांना उद्या या सांगितलं. त्यानुसार आज पोलीस गेल्यानंतर त्यांना घेरून दगडफेक करण्यात आली. यात अधिकाऱ्यांसह १२ पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर लाठीचार्ज झाला आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

हेही वाचा : जालन्यात मराठा आक्रोश मोर्चावर लाठीचार्ज, फडणवीसांचं नाव घेत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या नसत्या, तर…”

“लाठीचार्ज कमी प्रमाणात झाला आहे. काही अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या नसत्या, तर पोलिसांना बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : जालन्यात पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का केला? मुख्यमंत्री स्पष्टीकरण देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल”

“मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. आताही मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केली आहे. मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांवर प्रयत्न सुरू आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ नये. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. कोणाचीही चूक असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. शांतता पाळण्यात यावी,” असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं.