आपल्या नाशिक दौऱ्यादरम्यान उपमुख्यमत्री अजित पवार यांनी भल्या पहाटेच भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी अजित पवारांना पाहून आयोजकांचीही तारांबळ उडाली. “मी एवढ्या सकाळी येईन का? अशी चर्चा रंगली होती. एक तर म्हणाला हा बाबा सकाळी लवकर शपथ घेतो,” असं म्हणत अजित पावर यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

“काही जण चर्चा करत होते. मी सकाळी एवढ्या लवकर येईन का? त्यावर दुसरी व्यक्ती त्याला म्हणाली हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो,” असं अजित पवार यावेळी म्हणाले. यानंतर सर्वांमध्ये एकच हशा पिकला. “नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे या ठिकाणी मला बैठका आहेत. तुम्हाला लवकर उठून यावं लागलं यासाठी माफ करा,” असंही ते यावेळी म्हणाले. दोन महिन्यांपूर्वी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या घटनेची या निमित्तानं त्यांनी आठवण काढली.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही भाष्य केलं. “सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. परंतु समाजाच्या भल्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असं अजित पवार म्हणाले. “माझे आणि अशोक चव्हाणांचे वाद सुरू असल्याचं वृत्त ऐकीवात येत आहे. परंतु हे वृत्त खोटं आहे. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे सरकार चालवण्यासाठी योग्य ते लक्ष देत आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन थाळी यांसारख्या अनेक योजना सुरू केल्या. या योजनांच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या तर त्या आमच्या लक्षात आणून द्या. आम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू,” असंही पवार यावेळी म्हणाले.