सातारा : महाबळेश्वरला पर्यटनाच्या अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर महाबळेश्वरचे नाव कोरले जाईल या उद्देशाने महाबळेश्वर महामहोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे सांगितले.
महाबळेश्वर पर्यटन महामहोत्सव २०२५ चे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोल्फ मैदान येथे झाले. या वेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पर्यटन व पालकमंत्री शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाबळेश्वरला एक इतिहास आहे. आजूबाजूला गडकिल्ले आहेत. सध्याच्या जागतिकीकरणामध्ये पर्यटनाला खूप महत्त्व आहे. पर्यावरणपूरक पर्यटन महाबळेश्वरने कायमस्वरूपी राखले आहे. येथील जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पतींचा खजिना आहे. कोयना धरणाचे पाणी आहे. त्यामुळे येथील जंगल जगवून आणि मिळालेल्या शिवसागर जलाशयाच्या पाण्याचा पुरेपूर वापर करून पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या चांगल्या योजना राबविण्यात येणार आहेत. येथे पुस्तकांचे आणि मधाचे गाव आहे. या पर्यटन महोत्सवाकडे उत्सव म्हणून न पाहता महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू म्हणून पहावे असेही शिंदे म्हणाले.
पर्यटकांची सुरक्षा आणि सुरक्षितता यासाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्यात आले आहे. येथील जंगल राखले पाहिजे आणि पर्यटनही वाढले पाहिजे. मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय बोट क्लब, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग सुरू करण्यात येत आहे. तापोळा येथे सी लिंकच्या धर्तीवर मोठा पूल, निसर्गाचं अवलोकन करण्यासाठी गॅलरी उभारली आहे.
महाबळेश्वर येथे पहिल्यांदा पर्यटन महोत्सव होत आहे. यासाठी राज्य पर्यटन आणि पर्यटन विकास महामंडळ सक्रिय आहे. राज्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाने पावले उचलली आहेत. येथे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ, औषधी गुणधर्म असलेले पदार्थ, वस्तू आणि बचत गटांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी कायमस्वरूपी बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येत असताना पर्यटनावर भर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जागतिक पातळीवरून पर्यटक या ठिकाणी आला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अर्थकारणाला चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.
या वेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण झाले. या वेळी उपस्थित जपानी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.