लातूर : नैसर्गिक साखरेसह मराठवाडय़ातील संपूर्ण उसाचे गाळप करण्यात यावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर आयुक्तांना केली आहे. मराठवाडय़ातील काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात ऊस लागवड झाली असून उसाचे प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादन १२५ मेट्रीक टनाच्या पुढे गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी अतिरिक्त उसाविषयाचा प्रश्न बैठकीत मांडला. याबैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह साखर आयुक्त, साखर संघाचे अध्यक्ष व अन्य संचालक उपस्थित होते. मराठवाडय़ातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या गाळप क्षमतेपेक्षा अतिरिक्त ऊस असल्याने या अतिरिक्त उसाच्या शंभर टक्के गाळपासाठी महाराष्ट्र शासनाने वाहतूक, साखर उतारा घट अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव ठोंबरे यांनी बैठकीत मांडला. त्याला मराठवाडय़ातील राजेश टोपे, दिलीप देशमुख, अरिवद गोरे यांनी पाठिंबा दिला आणि मराठवाडय़ातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याबाबतचा आग्रह धरला. मराठवाडय़ातील अतिरिक्त ऊस त्या त्या कारखान्यांच्या शेजारील सर्व कारखान्यांना आणि प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस वितरित करण्याचे तसेच संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत शेजारील कारखाने बंद न करण्याचे लेखी आदेश देण्यात यावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी साखर आयुक्तांना केली. सोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांची ऊस तोड यंत्रणा येत्या चार दिवसांत ऊसतोडीस सुरुवात करत आहे. यात गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि., धोत्री व तुळजापूर, जयहिंदू शुगर प्रा. लि. आचेगांव, ता. दक्षिण सोलापूर, गोकुळ माउली शुगर्स लि. तडवळ ता. अक्कलकोट, जकरया शुगर लि. वटवटे ता. मोहोळ, लोकमंगल माउली इंडस्ट्रीज लि. लोहारा, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि. कुमठे, टिकेकरवाडी, बबनरावजी शिंदे शुगर इंड, केवड, येथे ऊसतोड सुरू होणार आहे. दररोज ५ ते ६ हजार मे. टन उसाचा यात समावेश असणार आहे.