Devendra Fadnavis मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली आणि हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला. मी आत्तापर्यंत दोन पत्रं सरकारला पाठवली आहेत. आता तिसरं पत्र राज्यातील सगळ्या शाळांना पाठवणार आहे. पहिलीपासून हिंदी भाषा कशासाठी शिकवली गेली पाहिजे? असा प्रश्न विचारत कुठल्या शाळा हिंदी शिकवतात ते बघतो. हे आव्हान समजायचं ते समजा असंही राज ठाकरे म्हणाले. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी यावर राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

हिंदी भाषा का लादण्याचा प्रयत्न आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. मुळात सरकारकडून हे सगळं लादलं का जातं आहे? हा माझा प्रश्न आहे. माझी पत्रकार परिषद महाराष्ट्रासाठी, पालकांसाठी, मुलांसाठी, शिक्षकांसाठी, शाळांसाठी आहे. महाराष्ट्राच्या शाळांना हे मान्य आहे का? सरकारला हे कोणतं धोरण आहे ते मला समजलेलं नाही. भाषावर प्रांतरचना झाली आहे तर मग हे भाषा लादण्याचं कारण काय? पत्रकार म्हणून तुम्ही, साहित्यिकांनी, लेखकांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारला गेला पाहिजे. हा विषय आज लादला गेला तर नजिकच्या काळात मराठीचं अस्तित्व हे संपवून टाकतील. जेवढा या हिंदी सक्तीला विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे. शाळा हिंदी भाषा कशी शिकवतात तेच आम्ही बघू. महाराष्ट्र सरकारला हे आव्हान वाटत असेल तर आव्हान असंही राज ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस यांचं राज ठाकरेंना उत्तर

“राज ठाकरे आणि माझी चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजेत तिसरी भाषा लादू नका. मी त्यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक राष्ट्रीय शिक्षण धोरणात तीन भाषांचं सूत्र आणलं आहे. जर देशभरात तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. तीन भाषांच्या सूत्रांविरोधात तामिळनाडूने कोर्टात धाव घेतली पण कोर्टानेही ते मान्य केलं नाही. तसंच आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यात गैर काय? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आहे. आपली भाषा शिकत असताना आपली मुलं जर एखादी भाषा आणखी शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान मुलांना निवडेल. राज ठाकरेंचा आग्रह आहे की दोनच भाषा ठेवा. पण केंद्र सरकारने दोन भाषाचं सूत्र नाही तर तीन भाषांचं सूत्र ठेवलं आहे. मुलांच्या सगळ्या मानसिकतेचा विचार करुन तज्ज्ञांनी तीन वर्षे चर्चा करुन, आक्षेप आणि सल्ले हे सगळं घेऊन हे सूत्र आणलं आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.