परभणी: ऑपरेशन सिंदूरच्या रूपाने पाकिस्तानमध्ये घरात घुसून भारताने पराक्रम दाखवला आहे. हा नवा आत्मनिर्भर भारत आहे. पाकिस्तानचे एकही क्षेपणास्त्र भारतभूमीला स्पर्श करू शकले नाही. काही लोकांच्या डोक्यात सातत्याने पाकिस्तानचाच विचार आहे. भारतीय सेनेने पाकिस्तानचे नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करतानाचे छायाचित्रण दाखवले तरीही काही लोकांकडून शंका उपस्थित केली जाते. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
येथील स्टेडियम मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पार पडलेल्या ‘विकास पर्व’ जाहीर सभेत फडणवीस यांचे भाषण झाले. यावेळी झालेल्या जाहीर सभेला पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, सर्जिकल स्ट्राइक असो अथवा ऑपरेशन सिंदूर असो आपल्या सेनेच्या शौर्यावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काम ‘पाकव्याप्त काँग्रेस’ करत आहे. याचा पुनरुच्चार यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. तिरंग्याचा मान कोणी कमी करू शकत नाही असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची आकडेवारी आता जाहीर झाली असून या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने १ लाख ६४ हजार कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक मिळवली आहे. देशातल्या एकूण परकीय गुंतवणुकीच्या चाळीस टक्के हे प्रमाण आहे. महाराष्ट्राने गेल्या दहा वर्षात हा विक्रम नोंदवल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेतून दिली. शेतकऱ्यांना मोफत वीज तर दिलीच पण २०२६ अखेरपर्यंत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा मोफत १२ तास वीज दिली जाईल यासाठी २१ हजार कोटी रुपये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फळ व अन्नप्रक्रिया उद्योगाचे क्लस्टर परभणी जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी आवश्यक ती साधने उपलब्ध करून दिली जातील असे सांगून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानंतर परभणीला अद्यावत असे कर्करोगाचे रुग्णालय निर्माण केले जाईल असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा करत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करत आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली अपूर्व असे राजकीय यश विधानसभेला मिळवले. भविष्यात शतप्रतिशत भाजपची वाटचाल सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी योग्य त्या पायाभूत सुविधा निर्माण करून देण्याचे प्रयत्न असून या वर्षभरात लघु व मध्यम स्वरूपाचे शंभर प्रकल्प उभे केले जातील असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याला असलेला प्राचीन वारशाचे जतन करून पर्यटनाला चालना दिली जाईल असे त्या म्हणाल्या.
‘आयात’ नव्हे, स्थानिक पालकमंत्री
परभणी जिल्ह्याला सातत्याने आयात पालकमंत्री लाभले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने पहिल्यांदाच स्थानिक पालकमंत्री जनतेला मिळाला. जिल्ह्यात केवळ पालकमंत्रीपदच दिले असे नाही तर तब्बल सहा खात्यांची जबाबदारी सोपवून भक्कम असे पाठबळ दिले असे फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.
(भारतीय जनता पक्षाच्या वतीने परभणीत गुरुवारी स्टेडियम मैदानावर विकास पर्व जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.)