विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीच्या नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमदेवारांचा विजय झाला. दरम्यान, या निकालानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महायुतीच्या या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली असून या विजयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आज महायुतीसाठी आनंदाची गोष्ट आहे. आमचे नऊ उमेदवार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा नऊ जागा लढवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेक जण वल्गना करत होते. आमचे उमेदवार पडतील, अशा प्रकारे सांगितले जात होतं. मात्र, आज आम्हाला आमची मते मिळाली, पण महाविकास आघाडीची मतेदेखील आम्हाला मिळाली आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुठली मतं कुठे गेली?

“मी मनापासून अभिनंदन करतो…”

या निवडणुकीत आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यादेखील विजय झाल्या आहेत. आमचे निवडून आलेले नऊ उमेदवार बघितले, तर सर्व उमेदवार हे सर्वसाधारण कुटुंबातील आणि जनतेसाठी काम करणारे आहेत. या निवडणुकीत निवडून आलेल्या महायुतीच्या सर्व नऊ उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रियाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना विधानपरिषद निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय

दरम्यान, आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी २६, योगेश टीळेकर यांना २६, परिणय फुके यांना २६, तसेच अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्येकी २६ मते मिळाली. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी केवळ २३ मतांची आवश्यकता होती. सदाभाऊ खोत वगळता २३ मतांचा कोटा भाजपाच्या पाचही उमेदवारांनी पहिल्या फेरीतच पूर्ण केला.

हेही वाचा – भारतीय संघाला दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या बक्षिसावरून विरोधकांची टीका; CM शिंदेंनी दि…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा बरोबरच महायुतीतील शिंदे गटाच्या दोन, तर अजित पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. अजित पवार गटाच्या राजेश विटेकर यांना २३, तर शिवाजीराव गर्जे हे २४ मते मिळाली. तर शिंदे गटाच्या भावना गवळी यांना २५, तर कृपाल तुमाने यांना २६ मते मिळाली. विशेष म्हणजे अजित पवार गटाकडे केवळ ४२ मते होती. मात्र, असे असतानाही त्यांना ४७ मते मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांच्यादेखील विजय झाला. तर शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.