राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. एकीकडे शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आता शिवसेनेनं दिलेल्या या ऑफरवर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांनी या प्रकरणासंदर्भात फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नावर उत्तर दिलं.

नक्की वाचा > शरद पवारांच्या ‘संभाजीराजे असोत की, आणखी कुणी…’ वक्तव्यावरुन निलेश राणे संतापून म्हणाले, “भूमिका बदलली नाही ते पवार…”

शिवसेना आणि संभाजीराजेमंध्ये काय संवाद झाला?
राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या एका मंत्र्याने संभाजीराजे यांची भेटही घेतली. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे. 

फडणवीस काय म्हणाले?
शिवसेनेनं संभाजीराजेंना दिलेल्या ऑफर संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी मोजक्या शब्दामध्ये या ऑफरशी आमचा काय संबंध आहे, असा प्रतिप्रश्न पत्रकारांना विचारला. “त्यांनी त्यांना ऑफर दिली. त्याचा त्यांनी निर्णय करावा. आम्हाला का विचारताय? आमचा काय संबंध आहे?”, असं फडणवीस प्रतिक्रिया देताना म्हणालेत.

नक्की वाचा >> “ज्या पक्षाने मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे…”; शिवसेना प्रवेशासंदर्भात संभाजीराजेंना निलेश राणेंचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजीराजेंची अडचण काय?
राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३१ तारखेपर्यंत आहे.