२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. पहिली अडीच वर्षे तुमचं सरकार होतं, आम्ही जे सरकार नंतर स्थापन केलं ती परिस्थिती वेगळी होती. आम्हाला माहीत होतं की पुन्हा निवडून यायचं असेल तर २०-२० ची मॅच खेळावी लागेल. त्यामुळे सगळे बॅट्समन मैदानात होते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. २०१९ मध्ये भाजपा आणि शिवसेनेला बहुमत मिळालं होतं. मात्र महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. अडीच वर्षांनी ते सरकार पडलं. आता राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं आहे. जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांना जाहीरनाम्याची आठवण केली. त्यावेळी जयंत पाटील यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

अनेक मुद्दे सभागृहात मांडले गेले. सगळ्या मुद्द्यांना एका उत्तरात देणं शक्य नाही पण धोरणात्मक बाबींवर मी बोलणार आहे. नागपूरचं अधिवेशन हे अंतरिम असं अधिवेशन असतं. या अधिवेशनात प्रश्नोत्तरं ठेवत नाही. या अधिवेशनात पुरवणी मागण्या आल्या पाहिजेत हे आपलं सरकार म्हणून धोरण असतं. सात दिवस अधिवेशन सुरु होतं. बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. आमच्यासाठी हे सरकार नव्याने आलं असलं तरीही मागच्या अडीच वर्षांच्या कामात केलेलं कंटीन्यूएशन आहे. मागच्या सरकारची कामं गतीने आम्ही पुढे जात आहोत. आमच्या जबाबदाऱ्या बदल्या आहेत. एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते, आता मी मुख्यमंत्री आहे. मात्र जबाबदाऱ्यांपेक्षा सामूहिकदृष्ट्या आम्ही जे निर्णय अडीच वर्षांत घेतले, ज्या योजना हाती घेतल्या त्यादृष्टीने आम्ही सरकारचं कामकाज सुरु केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि…

माझा नेहमी प्रयत्न असतो की जे तिकडे (विरोधी) बाकांवर बसून जे बोलतो ते इकडे आल्यानंतर पूर्ण केलं पाहिजे. मी जयंत पाटील यांचे आभार मानतो. कारण त्यांनी महत्त्वाचे मुद्दे आठवण करुन दिले. २०१९ मध्ये सरकार आमचं आलं होतं. काही कारणाने तुम्ही सरकार केलं. जाहीरनाम्याचा विचार करायचा तो तुमच्या जाहीरनाम्याचा करावा लागेल. आम्हाला हे माहीत होतं की अडीच वर्षांत निवडून यायचं असेल तर २०-२० ची मॅच खेळावी लागेल. आम्ही सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली की विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन म्हणून या ठिकाणी आलो. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर विधानसभेत नदीजोड प्रकल्पाची आणि इतर विदर्भातील प्रकल्पांची माहिती दिली.