कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडले आहेत. आता पुन्हा त्यांनी करोनाची तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. वारकरी संप्रदायाच्या नावावरती करोनाविषयी असे गैरसमज पसरवणे चुकीचं आहे, असं मत हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केलं.

डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, “इंदुरीकर महाराज यांनी ‘माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट असणार आहे’ अशा स्वरुपाचं वक्तव्य केलं आहे. माझ्यामते ते अशास्त्रीय विधान आहे. करोना कशामुळे होतो आणि तो टाळण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी शासन आपल्याला परत परत वेगवेगळ्या माध्यमातून माहिती देतंय. करोना हा एक विषाणूजन्य आजार आहे. त्याच्यापासून प्रतिबंध करायचा असेल तर आपण सर्वांनी लस घेणं गरजेचं आहे.”

“वारकरी संप्रदायाच्या नावावर करोनाविषयी गैरसमज पसरवणे चुकीचे”

“शासनाने आता बुस्टर डोस घेण्यास सांगितलं आहे. तो डोस घेणं देखील आवश्यक आहे. करोनाविषयी असे गैरसमज पसरवणं आणि ते देखील वारकरी संप्रदायाच्या नावावरती हे चुकीचं आहे. तुकाराम महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी आपल्याला कार्यकारणभाव सांगितला होता. ‘नवसा सायासे कन्यापुत्र होती, तर का करणे लागे पती’, असं जी वारकरी परंपरा सांगते तिच्या नावावर अशाप्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे ही चुकीची गोष्ट आहे,” असं मत हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट असणार; इंदुरीकर महाराजांचं विधान, म्हणाले, “आम्ही भाग्यवान…”

“अनेक लोकांना या अडचणीच्या परिस्थितीत खरंतर योग्य दिशेने न्यायला पाहिजे. आपण त्यांना याविषयी चुकीच्या अज्ञानाच्या गर्तेत टाकणारी विधानं करू नयेत. जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत हा गुन्हा होत नसला तरी साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यानुसार यावर कारवाई होऊ शकते का हे संबंधित अधिकाऱ्यांनी तपासून बघणं आवश्यक आहे,” असंही दाभोलकर यांनी नमूद केलं.

इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले होते?

इंदुरीकर महाराज म्हणाले होते, “दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले. ४० टक्के किर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार.” यावेळी त्यांनी मन खंबीर ठेवणं हेच करोनावरील औषध असल्याचं म्हटलं होतं.

मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही- इंदुरीकर महाराज

याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असे विधान इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केलं होतं. गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्ताने घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. महाविकास आघाडीचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं होतं.