विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर पाऊ स सुरू झाला. काल रात्रीपासून आज दिवसभरही पाऊस पडत होता. त्यामुळे शेवटच्या दिवसाची उमेदवाराची मतदान घडविणारी यंत्रणा गारठून गेली होती. पावसामुळे मतदान कसे घडवायचे ही विवंचना सतावत होती.
जिल्ह्यच्या काही भागात काल दुपारपासून तर बहुतेक भागात सायंकाळी पाच नंतर पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. आज दिवसभर देखील पावसाची अनेक भागात झिमझिम सुरू होती. प्रशासनाला मतदान पार पाडण्यासाठी दमछाक करावी लागली. पण उमेदवारांनाही प्रमुख कार्यकर्त्यांना रसद पोहोचविताना अडचणी आल्या. मतदानाच्या आदल्या दिवसाला कत्तलची रात्र असते. असे म्हणतात.
या दिवशी उमेदवारांची यंत्रणा ही मतदारांपर्यंत रसद पोहोचविण्याच्या कामाला लागलेली असते. काही उमेदवारांनी जेवणावळी ठेवल्या होत्या. मतदानाच्या चिठ्ठय़ा पोहोचविण्यासाठी मतदार याद्या व अन्य साहित्य गावोगाव पाठविण्यात आले होते. मात्र ते कार्यकर्त्यांकडे पडून होते. अनेक ठिकाणी ठेवलेल्या जेवणावळी बंद कराव्या लागल्या.
गेले पंधरा दिवस सोशल मीडियावर प्रचाराचा धुमाकूळ चालू होता. मात्र आज हा प्रचार काहीसा गारठलेला होता. प्रमुख कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी वाद होऊ नये म्हणून दक्षता घेतली होती. उमेदवारांनी तशा सूचना दिल्या होत्या. उद्या, सोमवारी मतदानाची टक्केवारी कशी वाढवायची याचीच विवंचना ही उमेदवारांना व नेत्यांना लागलेली होती. काल काही उमेदवारांनी रेनकोट व छत्र्यांची खरेदी केली. हे साहित्य गावोगावी रवाना करण्यात आले. पावसामुळे उमेदवारावर खर्चाचा मोठा बोजा पडला.