भंडारा : जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. नागपूर येथे  हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम चैतन्य पोलीस मैदान, भंडारा येथे झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धानाला बोनस जाहीर करावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून केली होती. त्यानुसार येत्या नागपूर अधिवेशनात बोनस जाहीर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

प्रत्येक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता यावी, यासाठी या उपक्रमास ३० नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. समृद्धी महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत वाढवणार आहे. ‘डीपीआर’चे काम गतीने होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> महाराष्ट्रातील वलयांकित वाघ नेमके गेले कुठे?; मृत्यू की शिकार हे गुलदस्त्सात; वनखात्याकडे नोंदच नसल्याने संभ्रम

यावेळी विविध योजनेच्या २७ लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील १६८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनही झोले.

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज – फडणवीस

येत्या काही दिवसात कृषी फिडर सौरऊर्जेवर टाकून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुमारे दोन हजार कोटींचे अग्रिम वाटप – अजित पवार

महत्त्वाकांक्षी सर्वसमावेशक पीकविमा योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यभर अग्रीम रकमेचे वाटप केले जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी होती, ती पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.