भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. इतर काही नेतेही शिवसेनेत आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी छोटेखानी भाषण केलं. नरकासूर कोण आणि त्याचा वध कसा करायचा हे तुम्हाला माहीत आहे असं सूचक विधान ठाकरेंनी केलं. तसंच नाशिकमध्ये मी पुन्हा येईन असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे. आज नरक चतुर्दशी आहे, कृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर कोण वेगळं सांगायची गरज नाही. त्याचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आली आहेत. आता हा प्रवाह सुरु झाला आहे. जे मतचोरी करुन तिकडे बसले आहेत त्यांची चोरी आपण चोरांसकट पकडली आहे. या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्व मराठी माणसं, अमराठीही एकत्र आले आहेत. कारण कुणालाच हे आवडलेलं नाही.

मी नाशिकमध्ये पुन्हा येईन-उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हा लढणारा आहे. संगीता गायकवाड आणि इतर सगळे शिवसेनेत आले मी सगळ्यांच्या देखत तुम्हाला विचारतो तुम्हाला काही खोके वगैरे मिळाले आहेत का? काही धाक दाखवला गेला का? कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं नेभळट असतात. यापेक्षा निष्ठावान सैनिक मला प्रिय आहेत. मी भाजपाच्या सगळ्याच नेत्यांना विनंती करतो आहे आपण कसं विष पोसत आहात याकडे डोळे उघडून बघा. इतिहासात पापाचे धनी म्हणून स्वतःची नोंद होऊ देऊ नका. मी नाशिकमध्ये तसा आधीही येऊन गेलो आहे. पण नाशिकमध्ये मी पुन्हा येईन. त्यावेळी भगवा फडकलेला असला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.