अमरावती : नांदगांवपेठ येथील औदयोगिक वसाहतीत पीएम-मित्रा योजनेअंतर्गत प्रस्तावित ‘टेक्सटाईल पार्क’ औरंगाबाद येथील ऑरिक सिटी मध्ये पळवण्याचे कारस्थान रचण्यात आले असून हे नवीन सरकारचे षडयंत्र असल्‍याचा आरोप माजी राज्‍यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्‍यक्ष डॉ.सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.

कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या पश्चिम विदर्भाच्‍या अर्थकारणाची दिशा बदलविण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. मागील वर्षाच्या  अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशात एकूण ७ पीएम मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल रिजन ॲन्ड अपेरल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली होती. याकरिता एकूण ४४४५ कोटी रुपये केंद्रीय अर्थसंकल्पातून उपब्ध्दत करुन देण्यात येतील व त्यातून ग्रीन फिल्ड तसेच ब्राऊन फिल्ड म्हणजेच नव्याने किंवा अस्तित्वात असलेल्या ठिकाणी हे पार्क उभारण्यात येतील असेही त्यांनी सांगितले होते. याकरीता केद्रीय वस्त्रोदयोग मंत्रालयाने सर्व राज्याकडून प्रस्ताव मागविले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्रशासनाच्या या योजनेमध्ये हा मेगा टेक्सटाईल पार्क अमरावती येथे उभारण्यात याव्या असा प्रस्ताव सादर केला होता.

अंतीम तिथीपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून फक्त अमरावतीचाच एकमेव प्रस्ताव होता. नंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार जावून शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीला जावून केंद्रीय अर्थमंत्री व वस्त्रोदयोग मंत्री यांची भेट घेवून या योजने अंतर्गत अमरावती ऐवजी औरंगाबाद येथील ऑरिक सिटी मध्ये अशा प्रकारचा मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याचा आग्रह धरला. त्यामुळे अमरावतीचा प्रकल्प निश्चितच बारगळणार आहे, असे डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएम मित्रा या योजनेच्या धोरण व दिशानिर्देशांमध्‍ये‍ एका राज्यात एकच मेगा पार्कची उभारणी करण्यात येणार असल्याचे नमूद आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या पार्श्वभुमीवर या आधीच अमरावती एमआयडीसी ने १ हजार हेक्‍टर जमिनीचे अधिग्रहण सुध्दा केलेले आहे. असे असतांना अनुशेषग्रस्त व संपूर्ण जगामध्ये कापूस उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या अमरावतीच्या नैसर्गिक हक्कावर गदा आणली. औरंगाबादचा प्रस्तावाकरिता आग्रह धरणे ही बाब अत्यंत निंदनीय असून नव्या सरकारच्या षडयंत्राचा हा भाग असल्याचे डॉ. सुनील देशमुख म्हणाले.