मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. महाबळेश्वर येथील दरे हे त्यांचं मूळ गाव. विविध कारणांसाठी ते गावच्या दौऱ्यावर सतत जात असतात. तसंच, गावी गेले की ते हमखास शेतीत रमतात. आताही ते गावातील यात्रेनिमित्त दरे येथे गेले आहेत. तिथे त्यांनी पुन्हा शेतीकामे केली. यासंदर्भातील माहिती देताना त्यांनी सुप्रिसद्ध कवियत्री शांता शेळके यांची कविताही शेअर केली आहे.

“हे एक झाड आहे याचे माझे नाते.. वाऱ्याची एक झुळूक दोघांवरूनी जाते.. मला आवडतो याच्या फुलांचा वास.. वासामधुनी उमटणारे जाणीव ओले भास..”, अशी कविता एकनाथ शिंदे यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे.

तसंच, ते पुढे म्हणाले, सुप्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांच्या ओळी माझ्या गावाच्या मातीत रमल्यावर माझ्या ओठी येतात, कारण गावातील मातीचा सुगंध मला शेतीकडे आणि माझ्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या गावी येतो तेव्हा तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात. महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात यात्रेनिमित्त आलो असता पुन्हा एकदा शेती आणि मातीत रमलो. यावेळी शेतीकाम करून एक अलौकिक आनंद मिळाला.

“माझ्या दरे या गावी औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड मी केली आहे”, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गावाकडची माणसं यांच्याशी असलेले नाते याचे आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. त्यामुळेच या ठिकाणी येऊन शेती केल्यावर एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.