सातारा : महात्मा गांधी व जमनालाल बजाज यांच्या कृतिशील मार्गदर्शनाने दलितांना खुले केलेले वाई शहरातील कोटेश्वर हे पहिले मंदिर आहे. कोटेश्वर मंदिरातून दलितोद्धाराचे व सामाजिक सुधारणेचे कार्य झाले. त्यामुळेच हे कोटेश्वर मंदिर सामाजिक सुधारणेची गंगोत्री ठरली. वाई हे शहर अशा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. येथील श्री कोटेश्वर मंदिराला काल श्री. सपकाळ यांनी भेट दिली. यावेळी सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले, की हे मंदिर इ.स. १८७० च्या सुमारास विनोबांचे आजोबा शंभुराव भावे यांनी बांधले होते. हे कोटेश्वर मंदिर दुमजली असून, सुमारे दीड हजार चौरस फूट जागेवर उभे आहे. मूळ मंदिराचे बांधकाम दगडी असून, सभामंडप चुना-विटांत बांधला आहे. मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करण्यात आला आहे. कोटेश्वरच्या सभा मंडपात भिंतीवर वारली पद्धतीचे रंगीत पौराणिक चित्रे आहेत. कोटेश्वराच्या गाभाऱ्यात राम-लक्ष्मण-सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आजही पाहावयास मिळतात. मंदिरात मुसलमान गवयाचे गाणे ठेवत, त्या वेळेस सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इ. स. १९१७ मध्ये मंदिरात वर्षभर राहून विनोबा भावेंनी भारतमातेच्या उद्धारासाठी महात्मा गांधींच्या सत्याग्रहश्रम तत्त्वाचा प्रचार केला. इ.स. १९२१ मध्ये विनोबांच्या वडिलांनी महात्मा गांधी व जमनालाल बजाज यांच्या कृतिशील मार्गदर्शनाने दलितांना खुले केलेले पहिले मंदिर आहे. शंभूराव भावे गोरगरिबांना बोलावून त्यांना भोजन देत असत. कोटेश्वर मंदिरातून असे सर्वधर्मसमभावाचे कार्य झाले, असे विजय दिवाण यांनी सांगितले.