अहिल्यानगरः देशात सद्य:स्थितीत उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश देतानाच आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांनी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
काल, शुक्रवारी जारी केलेल्या या आदेशात नमूद केले की, राज्यातील सर्व आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील याची खबरदारी घ्यावी. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर उपस्थित राहतील याची खबरदारी घ्यावी, रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन वाहने, सर्व आवश्यक जीवनरक्षक प्रणालीसह सहज उपलब्ध असावीत.
सर्व आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चितता करून घ्यावी. आवश्यक उपकरणे, स्ट्रेचर, अभिकर्मक, प्राणवायू व इतर जीवनरक्षक प्रणालीची तसेच बेडची उपलब्धता निश्चित करावी. फिरते वैद्यकीय पथक सक्षमपणे कार्यान्वित असल्याची खात्री करून घ्यावी. उपलब्ध असलेल्या रक्तपेढ्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यात याव्यात.
याशिवाय सर्व आरोग्य किट, अतिरिक्त डिस्पोजेबल वस्तूंसह शस्त्रक्रिया गृह (ओटी) कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी. उपलब्ध प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवाव्यात. आवश्यकतेप्रमाणे मॉक ड्रिल घ्यावे. ब्लॅकआऊट झाल्यास आरोग्य संस्थेची आपत्कालीन सेवा चालू राहतील. मात्र ब्लॅकआउट पाळण्यासंबंधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.भारत-पाक यांच्यातील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा आदेशात उल्लेख केला नसला तरी देशातील सद्य परिस्थितीकडे लक्ष वेधत हे आदेश देण्यात आले आहेत.