सातारा : सातारा शहर व परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे सातारा शहराला जोडणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरील विसावा नाका चौकाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले. या पाण्यात वाट काढताना दुचाकीस्वारांना अक्षरशः कसरत करावी लागली.
चौकातील रस्त्याचा समतोल बिघडला आहे. शिवाय येथील गटारांची अद्याप स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे एखादा पाऊस झाला, तरी या चौकात पाण्याचे तळे साचते. दुपारी झालेल्या पावसानंतर अशीच परिस्थिती निर्माण झाली. पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था कुचकामी ठरल्याने मुख्य चौकाला तळ्याचे स्वरूप आले. या तळ्यातून वाट काढताना दुचाकीस्वारांची पुरती दमछाक झाली. पादचाऱ्यांनाही या चौकातून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागली.
सातारा तालुक्यातील वर्ये, लिंबखिंड परिसरात चांगला पाऊस झाला. तर फलटण तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. एके ठिकाणी नारळाच्या झाडाने पेट घेतला, तर कापडगावला वीज पडल्याने गाय जागीच ठार झाली. जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. तापमानातही मोठ्या प्रमाणात उतार आला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार होत होते. त्यातच जिल्ह्यातील काही भागात पाऊसही झाला. ढगांच्या गडगडाटात पाऊस पडत होता. अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. तरीही रिपरिप सुरूच होती. त्यामुळे दुपारी पाऊस एकदम कमी होत गेला. या पावसामुळे सातारा शहरातील सखल भागात पाणी साचले. त्यामुळे दुकानमालकांची तारांबळ उडाली.