Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पेटले असून आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावर तब्बल दोन तास शिवसेना उबाठा गट आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. विरोधकांनी आज मालवण शहरात आंदोलनाची हाक दिल्यानंतर सदर राडा झाला. यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचे कुणीही राजकारण करू नये, अशी विनंती आणि सूचना त्यांनी केली आहे. तसेच यासाठी जे जबाबदार आहेत आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना कडक शिक्षा दिली जाईल, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूर येथील विमानतळावर आले असता माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना आजच्या राड्याबाबत प्रश्न विचारले. त्यावर ते म्हणाले, मालवणच्या घटनेवर कुणीच राजकारण करू नये, ही माझी विनंती आहे. महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुःखद घटना आहे. अशा घटनांची योग्य चौकशी करून कोण दोषी आहेत, हे समोर आले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याठिकाणी पुन्हा भव्य असा पुतळा उभारला गेला पाहिजे. आम्ही या तीनही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. नौदलाने ही बाब गांभीर्याने घेतली असून चौकशी समिती तयार केली आहे. या समितीने पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली आहे. नौदल यावर उचित कारवाई करेल. जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई करेल.

हे वाचा >> Aaditya Thackeray : “आपला मोर्चा होता, पण काही चिंधी चोर…”, आदित्य ठाकरेंची राणेंवर बोचरी टीका

महाराजांचा पुतळा कोसळण्यासाठी नेमकी कोणती घटना जबाबदार होती. त्यात काय चुका राहिल्या, या संदर्भातला अहवाल नौदल देणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही पोलिसांत एफआयआर दाखल केलेला आहे. नौदलाच्या अहवालानंतर पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाईल. तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहिर केल्याप्रमाणे नौदलाच्या मदतीने पुन्हा त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जाईल. ही घटना घडल्यानंतर जे जे करणे आवश्यक आहे, ते केले जात आहे. तरीही विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून विरोधकांनी खालच्या पातळीचे राजकारण करू नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Thackeray Group VS Narayan Rane
ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणेंचे समर्थक भिडले, (फोटो-अभिमन्यू लोंढे )

हे वाचा >> Narayan Rane : “एक-एकाला घरात घुसून मारेन”, पोलिसांसमोर नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारायण राणेंच्या धमकीवर बोलताना म्हणाले…

आज राडा झाला त्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणी काय केले त्यावर आज बोलणार नाही. पण माझी सगळ्यांनाच विनंती आणि सूचना आहे की, त्यांनी या विषयात राजकारण करू नये. तसेच नारायण राणे यांनी पत्रकार आणि पोलिसांना धमक्या दिल्या, असाही प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे. ते आक्रमकपणे बोलतात पण त्यांना धमकी द्यायची असेल, असे मला वाटत नाही.