शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर घडलं आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेऊन अडीच महिन्याहून अधिकचा कालावधी लोटला आहे. पण बंडखोरी नेमकी कोणत्या कारणातून घडली? याबाबत अद्याप अनेक प्रश्न जनतेच्या मनात कायम आहेत.

बंडखोरीचा विचार मनात कसा आला? असं विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करण्यास सेनेच्या आमदारांचा सुरुवातीपासून विरोध होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं जात होते, याच कारणातून बंडखोरी झाली असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “सत्तांतरासाठी आमदारांना भाजीपाल्याप्रमाणे विकत घेतलं” नाना पटोलेंची बोचरी टीका!

यावेळी आता बंडखोरी केली पाहिजे, हा विचार मनात कधी आणि कसा आला? असं विचारलं असताना एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणं आम्हाला आधीपासून मान्य नव्हतं. सेनेच्या आमदारांनाही मान्य नव्हतं, जनतेलाही मान्य नव्हतं. आम्ही पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यावेळी नेतृत्वाचा निर्णय झाला, आम्ही एकत्र काम करू लागलो. पण तेव्हाही आमदारांची याला मान्यता नव्हती.”

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर नव्हे, तर ‘या’ ठिकाणी दसरा मेळावा घ्यावा” रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

“सुरुवातीपासूनच आमचा याला विरोध होता. शिवसेनेला त्रास होत होता, कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं जात होतं. मविआ सरकारमधील काही घटक पक्षातील नेते आमच्याच आमदारांच्या मतदारसंघात जाऊन भूमीपूजन आणि उद्घाटनं करत होते. जो उमेदवार पराभूत झालाय, त्याला हाताशी धरून हे सर्व सुरू होतं. शिवसेनेची गळचेपी होत होती. बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार यांचीही सरमिसळ होत होती, यातूनच हा निर्णय झाला” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा कुठला पॉइंट होता का? जिथे तुम्हाला वाटलं आता डोक्यावरून पाणी जातंय, आता नाही राहायचं? असा कोणता मुद्दा ट्रिगर झाला? असं विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “एकदा ट्रिगर दाबला नव्हता, ट्रिगर दररोज दाबला जात होता. ट्रिगर दाबल्यावर जी गोळी सुटते, त्यात दररोज कुणी ना कुणी शहीद व्हायचा. यात शहीद झालेले ५० लोकं माझ्यामागे लागले होते, तुम्ही बंडखोरी करा, नाहीतर आम्ही करू….”