अहिल्यानगर: देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाची आठवण व प्रेरणा कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी शहरात उभारलेले शहीद स्मारक एक पवित्रस्थान ठरेल, असे प्रतिपादन मेजर जनरल विक्रम वर्मा यांनी केले.
शहरातील सैनिक लॉन येथील शहीद स्मारकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, ब्रिगेडियर सुनील कुमार, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सागर कोरडे, रोटरी क्लबचे डॉ. प्रसन्न देवचक्के आदी उपस्थित होते.
मेजर जनरल वर्मा म्हणाले, की नौदल, एनडीएमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. सैन्याच्या सक्षमीकरणात महिलांचे मोठे योगदान राहील. येथील सैनिकी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थीनी अधिकारी म्हणून सैन्यामध्ये भरती व्हाव्यात. देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबाची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची आहे. जवानांच्या कुटुंबीयांचे प्रश्न प्रशासनाने संवेदनशीलपणे सोडावेत.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, जिल्ह्यात सैनिकांची मोठी संख्या आहे. देशासाठी ५१ सैनिकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या स्मरणानार्थ शहीद स्मारक उभारले. हे स्मारक प्रेरणा देणारे ठरेल. सैनिकी वसतिगृह नूतनीकरणास जिल्हा नियोजन समितीतून ४ कोटींचा निधी दिला आहे. गतवर्षात ५ कोटीचे ध्वजदिन निधी संकलन करून जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला. यावर्षी आतापर्यंत ३.५ कोटी निधी संकलन झाले असून गतवर्षीपेक्षा अधिक निधी संकलनाचा संकल्प केला आहे.
ब्रिगेडियर सुनील कुमार, डॉ. प्रसन्न देवचक्के, अंबिका भोंदे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सागर कोरडे यांनी केले. शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून, सैन्यदलाने शहिदांना मानवंदना दिली. वीरमाता, वीरपिता, वीरपत्नीचा तसेच शहीद स्मारकाच्या उभारणीत योगदान दिलेल्या व्यक्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर कल्याण संघटक चंद्रकांत शिंदे यांनी आभार मानले.
सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंधरवडा
आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी १६ ते ३० जून दरम्यान पंधरवड्याचे आयोजन केले आहे. विविध यंत्रणांच्या सहभागाने सैनिक व कुटुंबीयांचे प्रश्न सोडवले जातील. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. शहीद स्मारकाची अत्यंत कमी वेळेत दर्जेदार उभारणीस सहकार्य केलेल्या संस्थांचे आभारही जिल्हाधिकाऱ्यांनी मानले.
माजी सैनिकांसाठी आदर्शगाव
पद्मश्री पोपटराव पवार यांनी जिल्हा प्रशासन व सेना विभागाच्या माध्यमातून गावे दत्तक घेऊन एक आदर्शगाव विकसित करण्याचा मानस व्यक्त केला. माजी सैनिक व प्रशासन अधिकाऱ्यांची एक बैठक हिवरेबाजार येथे घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.