हिंगोली: वसमत तालुक्यातील कोठारी-टोकाई साखर कारखाना मार्गावर शुक्रवारी रात्री उभ्या टिप्परला मोटार धडकल्याने झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. शेख अमीर (वय २ वर्षे )आणि शेख अमीर (वय ४० ) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील सहा जखमींना पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील कार्यक्रमासाठी एका कुटुंबातील आठ जण मोटारीने वसमतकडे निघाले होते. ही मोटर कोठारी ते टोकाई साखर कारखाना मार्गावरील टिपरला धडकली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडला तेव्हा याच मार्गावरून हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चालले होते. त्यामुळे जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवता आले. पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, साईनाथ कंठे, रवींद्र साळवे, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांनी जखमींना मदत केली.