कराड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्चसुरक्षा वाहन क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) लावणे बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, १६ जूनपासून उच्चसुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी नसलेल्या जुन्या वाहनांचे कोणतेही शासकीय कामकाज केले जाणार नसल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कणसे यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, या सेवांमध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, वित्तीय बोजा चढविणे / काढणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, नाहरकत प्रमाणपत्र, तसेच वाहन रचनेतील बदल इत्यादी सर्व प्रकारच्या सेवांचा समावेश आहे. ‘एचएसआरपी’ बसविल्याशिवाय वरीलपैकी कोणतीही सेवा उपलब्ध होणार नाही. मात्र, ज्या वाहनधारकांनी आधीच ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे, त्यांच्यासाठी अपॉइंटमेंटची पावती दाखविल्यास कामकाज करण्यात येईल.
त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या जुन्या वाहनांवर ‘एचएसआरपी’ बसवून घ्यावी. अन्यथा १६ जूनपासून वाहनाशी संबंधित शासकीय सेवा उपलब्ध होणार नसल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन कराड उपप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.