अलिबाग: रायगड जिल्ह्यात ८३ हजार ८९० हजार हेक्टरवर यंदा खरीपाच्या लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भात आणि नागली पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात भाताची आणि नाचणी पिकाची उत्पादकता वाढविण्यावर यंदा भर दिला जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे.

रायगड जिल्ह्यात ९५ हजार ६४५ एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदा ८१ हजार ३३५ हेक्टरवर भात लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे .गेल्या वर्षी ७८ हजार ७००हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. यंदा लागडवड क्षेत्र ३ हजार हेक्टरने वाढवण्याचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.

गेल्या वर्षी प्रती हेक्टरी उत्पादकता २ हजार ३४८ किलोग्रँम होती. यावर्षी त्यात २ हजार ९९५ किलो ग्रॅम वाढ करण्याचे उद्दीष्ट अपेक्षित आहे. जिल्ह्यात २ हजार ८११ हेक्टर नाचणी लागवडीखालील क्षेत्र आहे. यापैकी गेल्या वर्षी २ हजार ४९१ हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यात आली होती. यंदा २ हजार ५५० हेक्टरवर नाचली पेरणीचे लक्षांक कृषी विभागाने ठेवला आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी १८ हजार २०० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यात १६ हजार क्विंटल सुधारीत तर २०० क्विंटल संकरीत भात बियाण्याचा समावेश आहे. महाबिज आणि इतर खाजगी कंपन्याकडून हे बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नियोजन पूर्ण झाले आहे.

खरीप हंगामासाठी १६ हजार ०२५ मेट्रीक टन खतांची मागणी शासनाकडे रायगड जिल्हा कृषी विभागाने केली आहे. यात ११ हजार ९१० मेट्रीक टन युरीया, १ हजार २५५ मेट्रीक टन डिएपी, १८०० मेट्रीक टन एनपीके तर १ हजार मेट्रीक टन इतर मिश्र खतांचा समावेश आहे. कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत.

दरम्यान, औद्योगीकीकरण आणि शहरीकरण यामुळे शेतीक्षेत्र घटत असले तरी शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढवण्यावर भर द्या असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी कृषी अधिकाऱ्यांना दिले.

नाविन्यपूर्ण पिकांची लागवडीचे प्रयोग होणार

नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत यावर्षी जिल्ह्यात हळद, लाल आणि काळ्या रंगाचा भात, कणघर, ड्रॅगन फ्रुट, करटोली, काळीमिरी आणि मोगरा या पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा तालुक्यात ही लागवड केली जाणार आहे.

शेतकऱ्यांची लगबग…

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी देखील कामाला लागला आहे. पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरु केली आहेत. दक्षिण रायगडात धूळपेरणीची कामे सुरु झाली आहेत. बांधबंदिस्ती , चर मारणे, तसेच शेतीच्या मशागतीची कामे देखील सुरु झाली आहेत.

पिक कर्ज वाटपात राजकारण नको…

खरीप आढावा बैठकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पिक कर्ज वितरणात होत असलेल्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त केली. सुधागड तालुक्यात कर्ज वितरण करताना शेतकऱ्यांची अडवणूक झाल्याचे त्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्या निदर्शनास आणून दिले. कर्ज वितरणात कुठल्याही परिस्थितीत राजकारण येऊ देऊ नका असा सल्ला त्यांनी दिला.