सांगली : आठ दिवसांपुर्वी वास्तव्यास आलेल्या प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आरग (ता. मिरज) येथे गुरूवारी रात्री उघडकीस आला. आरग येथे गणपती मंदिराजवळीला नाईक वस्ती येथे भाड्याच्या घरात आठ दिवसापुर्वी वास्तव्यास आलेल्या सुनील पोपट कोळी (वय २४ रा. बिचुद, ता. वाळवा) आणि निकिता मिलिंद कांबळे (वय २० रा. मोराळे, ता. पलूस) या दोघांनी भाड्याच्या घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेउन आत्महत्या केली.

आठ दिवसापुर्वीच दोघेही आपले गाव सोडून राहण्यासाठी आरग येथे आले होते. यामुळे त्यांचा फारसा परिचय या ठिकाणी नव्हता. काल दुपारी सुनिल कोळी हा घराबाहेर गेला होता. सायंकाळी घरी आल्यानंतर तरूणीने आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर त्यानेही आत्महत्या केली. हा प्रकार आजूबाजूला राहणार्‍या लोकांच्या लक्षात उशिराने आला. यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास संपर्क साधण्यात आल्यानंतर दोघांच्या आत्महत्येचा प्रकार समोर आला.

हेही वाचा : “…तर तुम्ही राजकारण विसरून जाल”, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला; म्हणाले, “या सत्ताधाऱ्यांना आमची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार दोघांचेही यापुर्वी विवाह झाले होते. मात्र, एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडप्याने आरग गावी येउन एकत्र वास्तव्य करण्याचा विचार केला होता. मात्र, काल त्यांच्यामध्ये कुरबुर झाली असावी यातूनच आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर दोघांचेही पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात शुक्रवारी दुपारी देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.