सांगली : पाणी द्या, अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ असा इषारा देणाऱ्या जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित राहिलेल्या ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ योजनेचे काम सुरू करण्यात आले. राजकीय श्रेयवादाचे युद्ध टाळण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता योजनेचे काम सुरू झाले. सांगली जिल्ह्यातील जत पूर्व भागातील ६५ गावांसाठी एक हजार ९२८ कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. कामाच्या पहिल्या टप्प्याचे ९८१ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांचे काम कोल्हापूरच्या लक्ष्मी इन्फ्रा या कंपनीस मिळाले आहे. जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ठेकेदाराने मिरज तालुक्यातील आरग आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील लोणारवाडी येथे कामाला सुरुवात केली आहे. हेही वाचा - “व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखं…”, ठाकरे गटाचा टोला योजनेचा जत तालुक्यातील १२५ पैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. मात्र, पूर्व भागातील ६५ गावे पाण्यापासून वंचित होती. त्यांना पाणी देण्यासाठी राज्य शासनाने विस्तारित म्हैसाळ योजनेमधून जत उपसा सिंचन योजना मंजूर केली. मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे मिरज तालुक्यातील बेडग येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून ६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येईल. यासाठी शासनाने १ हजार ९२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ९८१ कोटी ६० लाख ९२ हजारांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती. ठेकेदार कंपनीने चार दिवसांपूर्वी उद्घाटनाचा कोणताही सोपस्कार न करता थेट कामाला सुरुवात केली आहे. श्रेयवादाचे राजकारण टाळण्यासाठी सुधारित योजनेचे उद्घाटन न करताच ठेकेदाराने काम सुरू केले आहे. या गुपचुप काम सुरू झाल्याची राज्यकर्त्यांना कल्पना येताच त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. हेही वाचा - रायगडात विविध रंगी भात लागवडीचे प्रयोग, गुळसुंदे शेतकऱ्यांनी पिकवला काळा भात मूळ म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीनच्या संतुलन जलाशयांमधून पाणी उचलून एकूण ५७ किलोमीटर अंतरावर जत तालुक्यातील मौजे येळदरी येथे भूतलांक ७४० मीटर उंचीवर पाणी पोहोचविले जाणार आहे. मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातून जत तालुक्यापर्यंत जाणार आहेत. या कामाची आरग व लोणारवाडी येथे सुरुवात करण्यात आलेली आहे.