नाटककार आणि सामाजिक कार्यकर्ते अतुल पेठे यांनी कलाकारांच्या व्यक्त न होण्यावर त्यांची परखड मतं मांडली आहेत. त्याचप्रमाणे पुरोगाम्यांना फुर्रोगामी वगैरे म्हणणं हा राजकारणाचा भाग आहे असंही अतुल पेठे म्हणाले आहेत. तसंच विनोबा भावे यांनी हिंदू धर्माची जी व्याख्या सांगितली मी त्या विचारांचा पाईक आहे असंही अतुल पेठे म्हणाले आहेत.

कलाकाराचं काम व्यक्त होणं आहेच-अतुल पेठे

जर व्यक्त व्हायचं नसेल तर मग तुकाराम महाराजांपासून प्रश्न निर्माण होतील. वेदांचा तो भार असं तुकाराम महाराज म्हणाले आहेत त्यामुळे त्यांच्या गाथा बुडवल्या. तरीही आपण तुकारामांना महत्त्वाचं मानतोच. कारण त्यांनी काही फक्त विठ्ठलाची स्तुती करणारी गाणी लिहिली नाहीत. लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं. हंगामा खडा करना हमारा मकसद नहीं और कभी नहीं था. काहीतरी बोलून दुसऱ्यांच्या भावना दुखावणं याला माझा आक्षेप आहे. दुसऱ्याचा विचार करुनच बोललं पाहिजे असं मत अतुल पेठे यांनी मांडलं आहे

फुर्रोगामी वगैरे म्हणणं हा राजकारणाचा भाग झाला आहे-अतुल पेठे

एखाद्या काळात सगळंच वाईट चाललं आहे असं वाटत नाही. माझी भूमिका आशावादी आहे, कारण आशावादी नसेन तर मी नाटकच लिहू शकत नाही. वेटिंग फॉर गोदो हेच शिकवतं की उद्या परिस्थिती बदलणार आहे. त्यामुळे कालखंड वाईट असतात, त्या कालखंडातील माणसं प्रश्नांना सामोरी कशी जातात आणि आकलन कसं करतात हे महत्त्वाचं आहे. मी महाराष्ट्रात जिथे फिरतो तिथे मी पाहतो की तरुण, मुलं, मुली हे सगळेच नव्या विचारांनी भारलेले आहेत त्यांना काहीतरी करायचं आहे. आत्ताचा कालखंड हा गंमतीदार आहे. फक्त भारतात नाही तर जगभरात आहे. मला अनेकजण कम्युनिस्ट, समाजवादी वगैरे म्हणतात. महाराष्ट्रात एक बरं असतं की महाभारत न वाचताही त्यावर बोलणारे लोक खूप असतात. कशाविषयी काहीच माहीत नाही आणि बोलता येतं. मी कुठल्या पक्ष किंवा संघटनेचा बांधील माणूस नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी पुरस्कर्ता आहे. फुर्रोगामी वगैरे म्हणणं हा राजकारणाचा भाग आहे असं मला वाटतं असं अतुल पेठे म्हणाले. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत अतुल पेठेंनी ही भूमिका मांडली.

पुरोगामी असणं चूक आहे का? अतुल पेठेंचा सवाल

पुरोगामी असायला नको का? चांगली कविता लिहायची नाही का? सतीची चाल पुन्हा आणायची आहे का? मुंडन प्रथा वगैरे रुजवायची आहे का? आगरकर पुरोगामीच होते, राजा राममोहन रॉय पुरोगामीच होते. पुरोगामी म्हणजे प्रोग्रेसिव्ह. र. धो. कर्वेही पुरोगामीच होते. आगरकरांची परंपरा ही र. धो. कर्वेंनी पुढे चालवली आणि बुद्धिप्रामाण्यवादाच्या विचारांवर दाभोलकरांनी कर्वेंची परंपरा पुढे चालवली. पुरोगामी म्हणून मला कुणी शिवी दिली तर मी ती शिवी म्हणून घेणार नाही. एखादा माणूस जर मला म्हणाला की तुम्ही गाढव आहात तर मला माहीत आहे ना मी नाही. तो कुठल्या तरी वेगळ्या गाढवाला म्हटला असेल, किंवा त्याचा तो भ्रम असेल त्याला तपासलं पाहिजे. गाणाऱ्याच्या गळ्यात दोष असतो तसा ऐकणाऱ्याच्या कानातही असू शकतो. मी वंचित, शोषित, पीडितांच्या बाजूने आहे असंही अतुल पेठे या मुलाखतीत म्हणाले.

मी विनोबांनी सांगितलेल्या विचारांचा पाईक आहे-अतुल पेठे

मी फॅसिझमच्या विरोधात आहे. हिटलरने, मुसोलिनीने काय केलं माहित आहे का? माणसांना मारलं. ते चुकीचं आहे. माणसं माणसंच असतात आणि त्यांचं रक्त लालच असतं. धर्म, आयडिओलॉजी या भोवती कथा रचल्या आहेत. मी, तुम्ही आपल्या सगळ्यांची पृथ्वी आहे ती काही अमुक अ ब क लोकांची नाही. जातपात, धर्म, भाषेच्या भिंती तयार केल्या आहेत. एकमेकांचा आदर करा की त्यात काय चूक आहे. मानवतावादी दृष्टीकोन असला पाहिजे. जात हा कलंक आहे, पण धर्मामध्ये वैविध्य आहे. धर्माचं रुपातंर धर्मांधेत करणं गैर आहे असंही अतुल पेठे यांनी म्हटलं आहे. मी हिंदू आहे पण मला मुस्लिमांविषयी द्वेष करण्याचं काही कारण नाही. माझा धर्म मला द्वेष शिकवतच नाही. हिंदू या शब्दाची विनोबांनी केलेली व्याख्या आहे हिंसेने दुःखी होतो तो हिंदू मी त्या विचारांचा पाईक आहे असं अतुल पेठे म्हणाले.