लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. १९ तारखेपासून मतदानाचे टप्पे राज्यासह देशभरात सुरु होत आहेत. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीबरोबर हातमिळवणी केलेली आहे. तर गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. अशात आशिष शेलार यांनी एक मोठा दावा केला आहे तोदेखील उद्धव ठाकरेंबाबत.

आशिष शेलार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला २०१६-१७ मध्ये युतीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी त्यांना शिवसेना बरोबर नको होती. आम्ही तो प्रस्ताव मान्य केला नाही. ती आमची चूक झाली. त्यावेळीच जर राष्ट्रवादीशी युती केली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. असं आशिष शेला यांनी म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणं ही आमची सर्वात मोठी चूक झाली त्यांनी आमचा विश्वासघात केला असं आशिष शेलार म्हणाले.

उद्धव ठाकरेंबाबत काय दावा केला?

उद्धव ठाकरेंनी आमच्याशी गद्दारी केली. एकनाथ शिंदेंनी नाही. उद्धव ठाकरेंच्या गद्दारीमुळेच एकनाथ शिंदे भाजपाबरोबर आले. आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे शिवसेनेने २०१९ ला मिशन १५१ चा नारा दिला. आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी हे केलं. तसंच उद्धव ठाकरे अमित शाह आणि मोदींच्या संपर्कात आहेत का? याचंही उत्तर दिलं.

हे पण वाचा- मुंबईसाठी केलेले चांगले काम दाखवा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

उद्धव ठाकरे अमित शाह आणि मोदींच्या संपर्कात?

उद्धव ठाकरे मोदी आणि अमित शाह यांच्या संपर्कात आहेत का? याबद्दल मी भाष्य करणार नाही. पण उद्धव ठाकरे ज्या प्रकारे आमच्या विरोधात बोलत आहेत ते पाहता त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे बंद झाले आहेत. आम्ही एका ठाकरेंना लांब केलं आणि दुसऱ्या ठाकरेंना जवळ केलं कारण दोघांमध्ये वैचारिक फरक आहे. राज ठाकरेंनी देशहितासाठी आम्हाला पाठिंबा दिला तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी गद्दारी केली. असं आशिष शेलार एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

राज ठाकरे महायुतीचा प्रचार करतील

राज ठाकरे आमच्या बरोबर आले आहेत. त्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. राज ठाकरे लवकरच महायुतीचा प्रचार करतील अशी माझी अपेक्षा आहे. तसंच ठाणे, नाशिक मुंबई या सगळ्या जागांचा महायुतीचा निर्णय लवकरच होईल असंही शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.