Jalgaon Pushpak Train Accident Latest Updates : जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी प्रवासी संदीप जाधव यांनी माहिती दिली आहे.

प्रवासी संदीप जाधव यांनी काय सांगितलं?

पुष्पक एक्स्प्रेस जळगाववरुन आली होती. तेवढ्यात कुणीतरी म्हणालं की आग लागली. आग लागली म्हटल्यावर लोकांनी उड्या मारल्या. समोरुन बंगळुरुहून येणारी दुसरी गाडी होती, त्या गाडीखाली लोक चिरडले गेले आहेत. किती लोक चिरडले गेले हे माहीत नाही. मात्र ब्रेक दाबल्यावर ज्या ठिणग्या उडाल्या त्यामुळे स्लीपर डब्यातल्या लोकांनी उड्या मारल्या. परांडा स्टेशनच्या अलिकडे हा अपघात झाला. किती लोक जखमी झाले आहेत? किंवा किती लोक दगावले आहेत ते समजू शकलेलं नाही अशी माहिती प्रवासी संदीप जाधव यांनी दिली. परांडा स्टेशन हे या ठिकाणाहून सात ते आठ किमी अंतरावर आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

पाच ते सहा प्रवासी आहेत त्यांना दुसऱ्या रेल्वेने उडवलं आहे. या दुर्घटनेच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे. सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. जखमींना आम्ही तातडीने ग्रामीण रुग्णालयासह एकूण तीन रुग्णालयांमध्ये दाखल करतो आहोत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकी काय घटना घडली?

जळगावहून पुष्पक एक्सप्रेस निघाली होती, परांडा या स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण झालं आणि काही ठिणग्या उडाल्या. या पाहून एका प्रवाशाने आग लागली, आग लागली असं सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेतील ३५ ते ४० प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडलं. या अपघातात ७ ते ८ प्रवासी ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. एकाच डब्यातील लोकांनी या उड्या मारल्याचंही काही प्रत्यक्षदर्शींनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. रेल्वे प्रशासन आता घटनास्थळी पोहोचलं असून घटनेचा पंचनामा व मदतकार्य सुरू करण्यात आल आहे. तर, जळगावच्या खासदार स्मिता वाघ याही घटनास्थळी रवाना झाल्या असून त्यांनीही प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधत सूचना केल्या आहेत.