जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक थरारक घटना समोर आली आली आहे. तापी नदी काठावर शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या महिलेला बिबट्या श्वानाची शिकार करताना दिसला. बिबट्या आपलीही शिकार करेल, या भीतीने महिलेने तापी नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी तापी नदी काठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. तसा चोपडा तालुका म्हटलं म्हणजे पहाडी क्षेत्र आणि त्यातल्या त्यात हिंसक प्राण्यांचा वावर हा निश्चित असतो. त्यात लताबाई यांच्या नजरेस बिबट्या शिकार करण्यासाठी श्वानाच्या पाठीमागे लागलेला दिसला. बिबट्या आपलीही शिकार करेल या भीतीने त्यांनी तेथून नदीच्या दिशेने वाटचाल करीत दुथडी भरून वाहणाऱ्या तापी पात्रात उडी घेतली. सुमारे 60 किमी प्रवास करत लताबाई कोळी या अमळनेर तालुक्यातील सीमेवरील निम नदी काठावर नाविकांना केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या आढळून आल्या. लताबाई कोळी यांनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर नाविक बांधवांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी तात्काळ लताबाई कोळी यांना मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान, धाडसी लताबाई कोळी यांच्या धैर्यांची चर्चा जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात सुरू झाली आहे. लताबाई कोळींना, "देव तारी त्याला कोण मारी" असाच काहीसा अनुभव आला आहे.