अलिबाग: गावातील पाणी समस्या दूर व्हावी यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून जलजीवन पाणी योजना राबविण्यात येत असल्या तरी, अलिबाग तालूक्यात पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याकडे ग्रामपंचायतीकडून कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश ग्रामपंचायती पाण्याच्या स्त्रोता बाबत एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबत गावे स्वयंपूर्ण करण्याचा उद्देशच फोल ठरत आहे.
घरोघरी शुध्द आणि मुबलक पाणी पुरवठा करता यावा यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्यातून जलजीवन योजना राबविली आहे. पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत नाहीत तिथे नवीन स्त्रोत निर्माण करणे, जलशुध्दीकरण करून घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा हा या योजनेमागचा मुळ उद्देश आहे. रायगड जिल्ह्यात यासाठी १ हजार ४०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ज्यातील पन्नास टक्के योजनांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मात्र अलिबाग तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याची बाब समोर येत आहे. या ग्रामपंचायतीकडून जलजीवन योजनेसाठी स्त्रोत म्हणून एमआयडीसीच्या पाण्याचा पाईप लाईनचा वापर केला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे एमआयडीसीला कोणतीही पूर्व सूचना न देता जोडण्या घेतल्या जात आहे. त्यामुळे जलजीवन योजनांचा भार एमआयडीसीच्या पाण्यावर येत आहे.
अलिबाग तालुक्यातील अनेक गावांना तसेच अलिबाग शहराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायतीमध्ये करारही करण्यात आले आहेत. ज्यासाठी ठराविक रक्कम दरवर्षी एमआयडीसीला देणे अपेक्षित असते. मात्र अनेक ग्रामपंचायती एमआयडीसीला कुठलीही पूर्वसूचना जोडण्या घेत असल्याने वाढीव पाण्याचा अतिरिक्त भार एमआयडीसीवर पडत आहे.
काही ग्रामपंचायतीनी एमआयडीसीकडे पाण्यासाठी ठराव दिले आहेत. त्यानुसार त्यांनी एमआयडीसी पाईप लाईनवरून जोडण्या घेतल्या आहेत. मात्र या ग्रामपंचायतींनी जोडण्या घेण्यापूर्वी एमआयडीसी कडून हमीपत्र घेणे आवश्यक आहे. – निहाल चवरकर, अभियंता, पंचायत समिती अलिबाग
अलिबाग तालुक्यात अनेक गावांनी जलजीवन योजनेतील पाणी योजनांसाठई एमआयडीसी सोबत कुठलाही पत्रव्यवहार न करता परस्पर पाण्याच्या जोडण्या घेतल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे -संजय ननवरे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.