जालना : जालना शहरातील भटक्या श्वानांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रथम त्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याकरिता चालू आर्थिक वर्षात (२०२५-२०२६) २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रतिश्वान हजार रुपये असा दर ठरविण्यात आला होता. निविदा अंतिम करून कंत्राट निश्चित केले असले, तरी गेल्या ऑगस्टपासून केवळ ३०० श्वानांचे निर्बिजीकरण झालेले आहे. यापूर्वीही अशी निविदा निश्चित करण्यात आली होती; परंतु संबंधित कंत्राटदाराने महानगरपालिकेस पूर्वकल्पना न देता काम बंद केले होते. नंतर नव्याने निविदाप्रक्रिया करण्यात आली. जालना शहरात भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला असून, त्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याने रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, की शहरातील भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्याच्या कामासाठी चालू आर्थिक वर्षात २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासाठी निविदा काढून गेल्या मे महिन्यात कंत्राटदार निश्चित करण्यात आला आहे. या कंत्राटदाराने गेल्या ऑगस्ट महिन्यापासून श्वानांच्या निर्बिजीकरणाचे काम सुरू केले आहे. तेव्हापासून जवळपास ३०० श्वानांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. भटक्या श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करणे आणि त्यांना पुन्हा जेथून पकडले तेथे नेऊन सोडण्यासाठी प्रतिश्वान हजार रुपये देण्याचा करार आहे. त्यामुळे ऑगस्टपासून आतापर्यंत तीन लाख रुपयांचे काम झालेले असून, कंत्राटदारास अद्याप कोणतेही देयक अदा करण्यात आलेले नाही. निर्बिजीकरण शस्त्रक्रियेनंतर श्वानांना तेथे तीन दिवस ठेवावे लागते. सध्या असे एकच केंद्र शहरात असून, आणखी एक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. बाहेरच्या शहरांतून श्वान आणून सोडण्यात येत आहेत का, या प्रश्नावर सहायक आयुक्त चव्हाण म्हणाल्या, की अशा तक्रारी आमच्याही कानावर आलेल्या आहेत. बाहेरच्या शहरांतील श्वानांनी भरलेले वाहन पोलिसांच्याही निदर्शनास आले होते, अशी माहिती आहे.