राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर २०१९ मध्ये राष्ट्रवादीसह जायचं हे शरद पवारांनीच सांगितलं होतं का? यावरही जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे जयंत पाटील यांनी?

अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची बैठक बोलवली होती. त्यावेळी सुप्रिया सुळेही अजित पवारांना भेटल्या होत्या. काही वेळाने त्या बाहेर पडल्या. त्यानंतर काय घडलं त्याबद्दलही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

भाजपासह जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीत झालेलाच नाही

“भाजपासह सत्तेत जायचं हा निर्णय राष्ट्रवादीमध्ये झालेलाच नाही. तो निर्णय अजितदादांनी घेतला. त्यावेळी मला माहिती नव्हतं की सुप्रिया सुळे तिथे गेल्या. मी त्यांना नंतर विचारलंही नाही की तुम्ही तिकडे का गेलात म्हणून?” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. “अजित पवार गटाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा मला माहिती नव्हतं. त्यादिवशी त्यांनी सर्व आमदारांना बोलवून बैठक बोलावली होती. त्यावेळी बऱ्याच आमदारांचा मला फोन आला. आम्ही तिकडे जातोय जाऊ का? मी म्हटलं त्यांनी बोलावलं आहे तर जा. जायला काहीच हरकत नाही. मी माझ्या घरी आहे. तुमचं तिकडचं काम झाल्यावर माझ्याकडे या. काही आमदार मंत्री झाले त्यांनीही फोन केले. मी सर्वांना जा सांगितलं”, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

तुमचा तरी माझ्यावर कुठे विश्वास आहे?अजित पवारांचा जयंत पाटील यांना सवाल

शरद पवारांनी थांबायला पाहिजे का?

“अजित दादा काय म्हणले कुठेतरी थांबायला पाहिजे. पण कुठे थांबायचं ते हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. शरद पवार ८४ व्या वर्षी त्यांना काम करायची अजून इच्छा असेल तर त्यांनी थांबावं की न थांबावं हा त्यांचा चॉईस आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे अजित पावारांना वाटतं की, राजकारणात कुणीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाचा चॉईस आहे. मी कुठे थांबवायचं ते मी ठरवेल. दुसऱ्याबद्दल मी कसं बोलवेल? या वयात त्यांच्यासारख्या प्रचंड अनुभव असणाऱ्या आणि ज्यांची बुद्धी पूर्ण शाबूत आहे, पूर्ण कार्यक्षमतेने काम करु शकते, त्या व्यक्तीला त्यांनी आयुष्यभर तेच काम केलं आहे. त्यात काम करणं म्हणजेच त्यांच्या आयुष्याची वाढ होणं आणि त्यातच त्यांचं मन रमणं ते काम त्यांना थांबावायला सांगणं हे योग्य नाही”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली. टीव्ही ९ मराठीच्या ‘लोकसभेचा महासंग्राम’ या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.