एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केसरकरांना लक्ष्य केलं आहे. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार यांचा हात होता असं म्हणणाऱ्या केसरकरांना आव्हाड यांनी, “ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?” असा प्रश्न विचारलाय. आव्हाड यांनी ट्विटरवरुन केसरकरांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलीय.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

केसरकर पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?
“मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे”, असं केसरकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही असं सांगितलं होतं. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती,” असंही केसरकर म्हणालेत.

“त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. ‘मातोश्री’ कधी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं,” असंही केसरकर म्हणाले.

नक्की वाचा >> भविष्यात शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील का?; शहाजीबापू म्हणाले, “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य हे सर्व आमदारांच्या…”

आव्हाड यांचं उत्तर…
केसरकरांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांनंतर आव्हाड यांनी ट्विटरवरुन शिंदे गटाच्या प्रवक्त्यांना लक्ष्य केलं आहे. “अहो केसरकर किती बोलता पवारांविरुद्ध… एकेकाळी पवार यांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात,” असा सवाल आव्हाड यांनी केसरकरांना विचारला आहे. “२०१४ ला मीच आलो होतो पवार यांचा निरोप घेऊन, जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका,” असा टोलाही आव्हाड यांनी केसरकरांना लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००९ साली राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आल्यानंतर २०१४ साली दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर केसरकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.