हिंगोली : जिल्ह्यात ९ व १० जूनला झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वसमत, कळमनुरी तालुक्यातील सुमारे १ हजार ५७७ हेक्टर जमिनीवरील केळी, पपई या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्याचे काम पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५.७७ कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा, वारंगा, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव, भाटेगाव तर वसमत तालुक्यातील कुरुंदा गिरगावसह अनेक गावचे शेतकरी केळी व पपईचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात.
९ व १० जून रोजी या दोन्ही तालुक्यांत वादळवाऱ्यासह झालेल्या पावसात तोंडाशी आलेला केळी पिकाचा घास शेतकऱ्यांच्या हातून गेला. होत्याचे नव्हते झाले. अन् शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला.जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार कांबळे वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी प्रत्यक्ष गावोगावी पीक नुकसानग्रस्त शिवारात पाहणी करून नुकसानीच्या पंचनाम्याचे काम पूर्ण केले.
कळमनुरीत १ हजार ४९ हेक्टर जमिनीवरील तर वसमत तालुक्यात ५२८ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. जिल्ह्यात एकूण १ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई या फळबागाचे नुकसान झाले. या नुकसानपोटी शेतकऱ्यांना ५.७७ कोटींच्या मदतीची गरज असल्याचा प्रस्ताव महसूल प्रशासनाने शासनाकडे पाठवला आहे.