सावंतवाडी : कणकवली तालुक्यातील करंजे येथे खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेती शक्य नाही. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्य मातेचा दर्जा देऊन नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले आहे. रासायनिक शेतीमुळे आजार वाढत आहेत, त्यामुळे नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.”
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, नीलम राणे , माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवर्धन गोशाळेचे महत्त्व सांगितले ते म्हणाले,शेतकऱ्यांना व्यावसायिक शिक्षण देणारी व्यवस्था गोवर्धन गोशाळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.कृषी पर्यटनासोबतच गोसेवा पर्यटन केंद्र,देशी गायींच्या आधारावर खत, गॅस, पेंट निर्मितीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या भाकड गाईंसाठी सुरक्षित निवारा मिळेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सनातन धर्मात गोमातेला मोठे महत्त्व आहे. कृषी संस्कृतीत गोमातेशिवाय पर्याय नाही. पशुधन कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.रासायनिक शेतीमुळे जमिनीला धोका आणि आजारांचे प्रमाण वाढले. नैसर्गिक शेती आणि गोधन महत्त्वाचे आहे.देशी गायींचे संवर्धन महाराष्ट्रात वाढले पाहिजे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गोवर्धन गोशाळेतून प्रेरणा मिळेल.राज्य सरकारने नैसर्गिक शेती आणि गो संवर्धनाबाबत धोरण आखले आहे. खासदार नारायण राणे यांनी उभारलेली गोशाळा कोकणातील निसर्ग संपत्तीला साजेशी आहे.
खासदार नारायण राणे यांनी प्रास्ताविक केले तर आमदार निलेश राणे यांनी सर्वांचे स्वागत केले. पालकमंत्री नितेश राणे यांनी आभार मानले.डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमात गोवर्धन गोशाळेच्या माध्यमातून नैसर्गिक शेती आणि गोमाता संवर्धनाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.