संगमनेर : दिवंगत तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या नावाने देण्यात येणारा यावर्षीचा पहिला पुरस्कार वाई येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम लक्ष्मण आवळे मास्तर यांना दिला जाणार आहे. २ नोव्हेंबर रोजी संगमनेर मध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मालपाणी लॉन्समध्ये करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तसेच राज्यातील तमाशा कलेतील विविध मान्यवर कलाकार या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना खताळ म्हणाले की, संगमनेरचे भूमिपुत्र असलेले कवी अनंत फंदी, पहिल्या महिला तमाशा कलावंत पवळा हिवरगावकर भालेराव, गुलाबबाई संगमनेरकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या नावाने दरवर्षी राज्यातील कलावंतांना पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा निर्णय आपण आषाढी एकादशीच्या निमिताने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जाहीर केला होता.
यातील पहिला पुरस्कार कांताबाई सातारकर यांच्या नावाने तमाशा कलेमध्ये अनमोल योगदान देणारे सातारा जिल्ह्यातील वाई येथील कोंडीराम लक्ष्मण आवळे यांना देण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला आहे. मुंबई विद्यापीठातील कला विभागाचे प्रमुख व गायक प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या पुरस्कार निवड समितीने आवळे मास्तर यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मालपाणी लॉन्समध्ये करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तसेच राज्यातील तमाशा कलेतील विविध मान्यवर कलाकार या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत.
बिकट परिस्थितीतून कलेकडे
आवळे मास्तर यांनी १९७३ पासून तमाशा कलेसाठी स्वत:ला झोकून दिले. सात वगनाट्य त्यांनी शब्दबद्ध केली असून, अतिशय बिकट कौटुंबिक परिस्थितीवर मात करून त्यांनी पारंपरिक तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी कष्ट घेतले. चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडीक यांच्या बरोबरीने तमाशा कलेमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा यथोचित गौरव म्हणून आवळे मास्तर यांना तालुक्याच्या वतीने सन्मानित करण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी या वेळी सांगितले.
