कराड : खुनाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या संशयिताला उंब्रज पोलिसांनी वेशांतर करीत पाठलाग करून जंगलातून अटक केली. सूरज संपत साळुंखे (२९, रा. नागठाणे, ता. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. उंब्रज पोलीस ठाण्यातील फौजदार सागर खबाले, हवालदार नंदकुमार निकम, अंमलदार प्रफुल्ल पोतेकर हे खासगी वाहनाने तारळे दूरक्षेत्र परिसरात गस्त घालत होते. त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की वडूज (ता. खटाव) येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षापूर्वी झालेल्या खुनातील आरोपी सूरज साळुंखे हा (तारळे-जंगलवाडी, ता. पाटण) रस्त्यावर उभा आहे.

यानंतर फौजदार सागर खबाले यांनी याबाबत तातडीने उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना कळवण्यात आले. आणि तातडीने वेशांतर करून खबाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी रवाना होत कारवाई हाती घेतली. पोलिसांची चाहूल लागताच सूरज साळुंखे त्या ठिकाणाहून जंगलाच्या दिशेने पळून गेला. तेव्हा खबाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले. आणि त्यानंतर त्याला अटक करून वडूज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईमुळे एक वर्षाच्या खून खटल्याच्या तपासाला वेग येणार असल्याचे पोलिसांनी या प्रकरणी बोलताना सांगितले.

आत्महत्येचा बनाव झाला होता उघड!

कणसेवाडी (ता. खटाव) येथील ३४ वर्षीय विजय महादेव डोईफोडे यांनी १६ जून २०२४ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली होती. मात्र, पोलिसांना याबाबत शंका आल्याने याप्रकरणी कसून चौकशी केली. त्या वेळी डोईफोडे यांनी आत्महत्या केली नसून, त्यांचा खून झाला असून, आत्महत्येचा बनाव करण्यात आल्याचे तपासात समोर आले. वडूज पोलिसांनी याप्रकरणी अधिक बाबासाहेब जाधव (४०, रा. कणसेवाडी, ता. खटाव) याला अटक केली. सध्या तो प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन जामिनावर बाहेर आहे. तर, यातील दुसरा संशयित सूरज साळुंखे हा एक वर्षापासून फरार होता. आता, त्यास पोलिसांनी अटक केल्याने या खुनाच्या गुन्ह्याची उकल होण्याची चिन्हे आहे.

दरम्यान, दीर्घकाळ संशयित आरोपी सूरज साळुंखे हा फरार असल्याने या खुनाच्या गुन्ह्याची उकल होत नव्हती. परंतु, आता सूरज साळुंखेला अटक झाल्याने पोलिसांसमोरील हे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासाला गती मिळणार आहे.