Kolhapur Crime News : कोल्हापुरातील राजारामपुरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका ४० वर्षीय महिलेला तिच्या घरातील सदस्यांनी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. मागील दिड महिन्यांपासून त्या महिलेला बांधून ठेवलं होतं. आज (३० मे) पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तिला सोडवलं आहे. ही महिला गतीमंद असल्यामुळे तिचा भाऊ, भावजय व भाच्याने मिळून तिला बांधून ठेवल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) स्थानिक नेते संजय पवार संबंधित घरी गेले आणि त्यांनी महिलेच्या नातेवाईकाच्या कानशिलात लगावली. त्यांना पोलिसांनी बाजूला केलं, तसेच महिलेला सोडवलं. पोलिसांनी या महिलेचा भाऊ, भावजय व भाच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की मागील दिड महिन्यांपासून सदर महिलेला साखळदंडांनी बांधून ठेवलं होतं. तीन कुलुपं देखील लावण्यात आली होती. दोन कुलुपांची चावी सापडली, तर एक कुलुप तोडून महिलेला मुक्त करण्यात आलं. या महिलेची स्थिती खराब असून तिला उपचारांसाठी राजारामपुरी येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, संजय पवार म्हणाले, “ती महिला कशीही असली तरी तिला अशा पद्धतीने साखळदंडांनी बांधून ठेवणं चुकीचं आहे. दिड महिन्यांपासून तिला बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या शेजाऱ्यांना देखील या महिलेची दया आली नाही. कोणीही तिची मदत केली नाही, पोलिसांना कळवलं नाही. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात एखाद्या महिलेवर तिच्याच घरातील लोकांनी अशा प्रकारे अत्याचार करणं दुर्दैवी आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत अशा घटना अशोभनीय आहेत. असं कृत्य करणाऱ्यांना फटके दिले पाहिजेत. पोलिसांनी त्यांना कठोर शिक्षा द्यावी अथवा त्यांना आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही त्यांना योग्य शिक्षा देऊ”.
पीडित महिला गतीमंद असून तिचा लहान मुलांना त्रास होत होता, ती महिला रस्त्यावरील काहीही खात होती, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. मात्र, तिला अशा पद्धतीने बांधून ठेवणं चुकीचं असल्याचं सांगत पोलिसांनी तिची सुटका केली आहे. तसेच तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला बांधून ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, या महिलेचे कुटुंबीय आज घरी नव्हते. ते तिला साखळदंडांनी बांधून व घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.