राजापूर : कोकण परिसराला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटामध्ये शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली. घाटातील पिकनिक स्पॉटपासून वरच्या बाजूला काही अंतरावर ही दरड कोसळली आहे. त्यामुळे अणुस्कुरा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.

अणुस्कुरा घाटात पडलेली ही दरड हटवून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अकरा तासांनंतरही त्यामध्ये यश आलेले नाही. मातीच्या ढिगार्‍याखाली मोठे दगड असल्यामुळे रस्ता मोकळा करण्याच्या कामामध्ये सातत्याने व्यत्यय येत आहे. त्यामुळे घाटरस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर ठाकले आहे.

हेही वाचा…CM Eknath Shinde : “बंदच्या मागे महाराष्ट्रात काहीतरी अघटीत…”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर गंभीर आरोप; म्हणाले, “नवीन टीम बोलावून…”

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणामुळे मुंबईतून कोकणात येणारी वाहने पुणे मार्गे अणुस्कुरा घाटातून कोकणात येण्याला पसंती देताना दिसतात. त्याचवेळी गोव्याला जाणार्‍या पर्यटकांकडूनही याच रस्त्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे नागमोडी वळणांचा आणि उताराचा असलेल्या अणुस्कुरा घाटमार्गातून सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घाटामध्ये दरड कोसळली. त्यामुळे घाटमार्गातील वाहतूक पहाटेपासून ठप्प झाली आहे. त्याऐवजी घाटमाथ्यावर जाण्यासाठी किंवा तिकडून कोकणात येण्यासाठी अन्य पर्यायी मार्गांचा वाहन चालकांकडून उपयोग केला जात आहे.

हेही वाचा…राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बंद झालेला घाटमार्ग मोकळा करण्यासाठी सकाळपासून बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील बावधनकर आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून तात्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यामध्ये जेसीबी आणि तीन डंपरच्या सहाय्याने माती बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मातीच्या ढिगार्‍याखाली मोठमोठे दगड असल्याने रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये अडथळे येत आहेत. रस्त्यात आलेले दगड वेळप्रसंगी ब्रेकरच्या सहाय्याने फोडण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत घाटरस्ता वाहतुकीसाठी मोकळा झालेला नव्हता. त्यामुळे अणुस्कुरा घाटमार्ग गेल्या अकरा तासांपासून वाहतुकीसाठी बंद आहे.