राज्य सरकारचे नियोजन; स्थानिक पातळीवरील गोंधळाने नागरिकांना फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर शहराचा पाणीपुरवठय़ाचा प्रश्न राज्य शासनाने अतिशय गंभीरपणे घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शहराला दररोज १ कोटी लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रत्यक्षात उतरवत सरकार उत्तीर्ण झाले. मात्र, पुरेसे पाणी उपलब्ध करूनही ते योग्य पद्धतीने वितरीत करण्याची यंत्रणा उभी न करता आल्यामुळे सरकारने दिलेले पाणी लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली.

सरकारने रेल्वेने दररोज २५ लाख लिटर पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी निम्नतेरणा प्रकल्पातून दररोज ५० लाख लिटर पाणी लातूर शहराला पुरवण्याच्या योजनेचा शुभारंभ महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला.

डोंगरगाव बंधाऱ्यातून दररोज २५ लाख लिटर पाणी टँकरने उचलले जाते.  शहराला १ कोटी लिटर पाणी दररोज उपलब्ध होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेचे ७० टँकर पाणी वितरणात गुंतलेले आहेत. २०० लिटर पाणी एका कुटुंबाला काही प्रभागात सात दिवसांत तर काही प्रभागात २५ दिवसांत पोहोचते.

महापालिकेने सांगितलेल्या सर्व समस्यांचे निराकरण राज्य शासनाने केले. पसा, पाणी व कर्मचारी पालिकेला उपलब्ध केले आहे. आता सरकारसंबंधी तक्रार करायला पालिकेला तसुभरही जागा नाही. सरकारने आपले काम पूर्ण केले आहे. पाणी लातूरच्या दारापर्यंत पोहोचवले आहे. मात्र महापालिकेच्या ढिसाळ यंत्रणेत सुधारणाच होत नाही. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा अनुत्तीर्ण झाल्याची भावना लातूरकरांच्या मनात आहे.

 

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur municipal corporation failure in water distribution
First published on: 17-04-2016 at 02:43 IST