सोलापूर : मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळ्याकुट्ट काळात देशावरील कर्जाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पूर्वजांचे सोने, जमीन जुमला आपण सहसा विकत नाही. पूर्वजांनी ठेवून गेलेल्या मालमत्तेशी आपले आर्थिक, भावनिक आणि शाश्वत नाते असते. उद्याच्या संकटकाळात आपण वापरू शकतो. दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची मालमत्ता संपवून टाकतात. दारूड्याची वृत्ती आणि पंतप्रधान नरेंद्र यांची प्रवृत्ती एकच आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत सोलापूर, माढा आणि शेजारच्या धाराशिव ममदारसंघातील बार्शी आदी ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आंबेडकर यांच्या जाहीर सभा झाल्या. त्यावेळी बोलताना त्यांनी प्रामुख्याने भाजप आणि मोदी सरकारला लक्ष्य केले. मोदींचे राज्य हे केवळ वसुलीचे राज्य आहे. राजकारणी, व्यापारी, उद्योजकांवर छापे मारून निवडणूक रोख्यांच्या रूपाने वसुली केली जात आहे. गेल्या दहा वर्षात हेच आपण पाहतोय. म्हणून आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक कोणत्या तोंडाने मते मागणार आहेत, असा सवालही आंबेडकर यांनी केला.

हेही वाचा – माझ्यावर व उद्धव ठाकरेंवर टीका केल्याविना मोदींना स्वस्थता वाटत नाही – शरद पवार

हेही वाचा – पालकांशिवाय धैर्याने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प; १२ व्या वर्षी कामगिरी

मोदींच्या काळात तब्बल १७ लाख हिंदू कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व नाकारले आहे आणि ते सर्व परदेशात स्थायिक झाले आहेत, या आरोपाचा पुनरूच्चार करीत आंबेडकर म्हणाले, परदेशात स्थायिक झालेल्या हिंदू कुटुंबांकडे केलेल्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत म्हणून त्यांना धमकावले जात आहे. देशातील सार्वजनिक कंपन्या देशाचा आत्मा आहेत. हा आत्मा शरीरातून काढला जाऊ शकत नाही. मात्र पुढची आणखी पाच वर्षे मोदींना दिली तर ते देशाला कंगाल बनवतील, असाही आरोप आंबेडकर यांनी केला.