महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्व काही आलबेल आहे ना असा सवाल उपस्थित होत आहे. कारण आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे असा पुनरुच्चार काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. जालन्यामध्ये एका प्रचार समभेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रमाणिक भूमिका असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले. जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण आले होते.

“लोकांचा जीव वाचवला पाहिजे यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. या सर्व कामांवर लक्ष एकत्रित करुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे हे मुद्दाम सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला आहे. हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे,” असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना सध्या महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असल्याचेही ते म्हणाले. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयान जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाने आमची सर्वांचीच निराशा झाल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

दरम्यान, भाजपाला देशातील, राज्यातील आरक्षण संपून टाकायचे आहे असा आरोप यावेळी अशोक चव्हाण यांनी केला आहे. “त्यामुळेच भाजपा असहकार्याची भूमिका दाखवत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने योग्य भूमिका घेतली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकारने ५० टक्क्यांची अट न काढता अधिकार राज्यांना दिले. त्यांनी कायद्यात बदल केला नाही. संसदेत कायदा केला असता तर मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असता. मात्र, केंद्र सरकारला ५० टक्क्यांच्या वर आरक्षण द्यायचेचं नाही,” असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.