SC on Maharashtra Satta Sangharsh Updates: आज सकाळपासूनच सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्या जाणाऱ्या निकालाची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे निकाल कुणाच्या बाजूने लागणार? यावर तर्क-वितर्क आणि दावे-प्रतिदावे केले जात असताना अचानक विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल असल्याची चर्चा सुरू झाली. नंतर ते नाशिकमध्ये असल्याचं समोर आलं आणि त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी निकालावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार?
नरहरी झिरवळ यांनी १० महिन्यांपूर्वी शिंदे गटाच्या १६ आमदारांना पक्षविरोधी कारवायांच्यामुळे अपात्र ठरवण्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. आता झिरवळ यांनी आपण घेतलेला निर्णय कायद्याला धरूनच होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “हा निर्णय घटनेला धरूनच मी केला आहे. आजचा निर्णयही अपात्रतेचा येईल. जर १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते अपात्र झाल्यानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद जाईल. त्यानंतर सरकार कोसळेल”, असं नरहरी झिरवळ म्हणाले.
“घटना कुणाच्या दबावाखाली बदलत नाही. त्यामुळे आज त्यांचे आमदार अपात्र होतील. अध्यक्षही निर्णय घेताना घटनेचा आणि कायद्याचा अभ्यास करूनच घेतील. मी तेव्हा घेतलेला निर्णय चुकीचा म्हटलं तर आपण कायद्यावर संशय घेतोय असा त्याचा अर्थ होईल”, असंही झिरवळांनी यावेळी नमूद केलं.
Maharashtra Political Crisis: अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मला वाटतंय कदाचित…!”
“सर्वोच्च न्यायालय कायदा तपासूनच सर्व अँगलने विचार करून निकाल देणार. हा निर्णय फक्त राज्यापुरता मर्यादित नाही तर देशाला तो लागू होईल”, असंही झिरवळ म्हणाले.