२३ जुलै रोजी चिपळूणसहीत संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पडला. विशेष म्हणजे चिपळूणला या पावसाचा सर्वात मोठा फटका बसला. चिपळूणला पुराचा वेढा पडल्यानंतर त्यातून एसटीचे आगाराही सुटू शकले नाही. पाणी वाढण्याचा धोका पाहता अनेक गाड्या अन्य ठिकाणी स्थलांतरित करणे, आगारातील सामान सुरक्षित स्थळी हलवणे इत्यादी कामे पार पाडताना पाण्याची पातळी बघता बघता वाढली आणि एसटीच्या सात कर्मचाऱ्यांना जीव वाचविण्यासाठी एसटीच्या टपावर नऊ तास काढावे लागले.  नऊ तासांनी  त्यांची पोलिसांनी सुटका केली. या पुरात चिपळूण आगाराचेही मोठे नुकसान झाले. मात्र आगारामधील व्यवस्थापकाच्या प्रसंगावधामुळे राज्य परिवहन महामंडळाचं ९ लाख रुपयांचं नुकसान होण्यापासून वाचलं.

नक्की पाहा >> Chiplun Floods Viral Video: मदतकार्य करणारे तरुणीला दोरीच्या सहाय्याने गच्चीवर खेचून घेत होते अन् तितक्यात…

एसटीचे नऊ लाख रुपये वाचवण्यामध्ये आगाराचे व्यवस्थापक रणजित राजेशर्के आणि सात कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका निभावली. हे सात जण आगारामध्ये पाणी भरलं तेव्हा एसटीच्या टपावर नऊ तास एकाच जागी बसून होते. आगारात पाणी भरत असल्याची माहिती आगाराच्या सुरक्षा रक्षकांनी पहाटेच्या सुमारास शिर्के यांना फोनवरुन दिली आणि त्यांनी तात्काळ गुरुवारी पहाटे पावणेचार वाजता आगार गाठले.

नक्की वाचा  >> भास्कर जाधव प्रकरण : “या सोंगाड्यामुळे आमच्या १२ आमदारांचे निलंबन झाले ते कोणत्या नैतिकतेत बसते?”; भाजपा नेत्याचा सवाल

आगारात एकूण ११० गाड्या असतात. आदल्या दिवशी काही गाड्या अन्यत्र हलवण्यात आल्या. तर काही गाड्या पहाटे येऊन चालकांच्या मदतीने बाहेर काढल्या. फक्त २१ गाड्याच आगारात होत्या. त्याही आगारातील थोड्या उंचीच्या ठिकाणी तसेच इतर काही गाड्या आगारातील वर्कशॉपजवळ उभ्या केल्या. तसेच अन्य काही वस्तूही दुसरीकडे हलविल्या. तोपर्यंत पाहता-पाहता पाण्याची पातळी वाढू लागली. आगारातील मोजके  कर्मचारी आधीच बाहेर पडले होते. पाण्याची पातळी वाढू लागल्याने जीव वाचविण्यासाठी आगार व्यवस्थापक राजेशिर्के, एक सुरक्षा रक्षक आणि आणखी पाच कर्मचारी कार्यशाळेतील एसटीच्या टपावर चढले. मात्र यावेळी राजेशर्के यांनी आगारातील रोख रक्कम स्वत:सोबत घेतली होती. त्यामुळे हे पैसे वाचले.

नक्की वाचा  >> मुख्यमंत्र्यांसमोरच भास्कर जाधवांची पूरग्रस्त महिलेला दमदाटी; जाणून घ्या नक्की काय घडलं

बघता-बघता पाण्याची पातळी १२ ते १४ फुटांपर्यंत वाढली आणि आम्हाला धडकी भरली. आगारातील सामानाही डोळ्यादेखल वाहून जाताना वाईट वाटले. १५ संगणक वाहून गेले. यात २१ एसटी गाड्यांच्या टपापर्यंत पाणी येऊ लागले. त्यामुळे वर्कशॉपमधील टायर, तसेच गाड्यांच्या वरच्या बाजूला आणि मागील बाजूला असलेले टायरही वाहून गेल्याचे राजेशर्के यांनी सांगितले. माझा मोबाइलही आगाराबाहेर पडलेल्या एका कर्मचाऱ्याकडे राहिला. तर सोबत असलेल्या सहा कर्मचाऱ्यांपैकी एक दोघांचेच फोन लागत होते. त्यामुळे यंत्रणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. तर दुसरीकडे प्रचंड पाऊस आणि वाढलेली पाण्याची पातळी पाहून धडकी भरत होती.

नक्की वाचा >> मनसेचा इशारा, “भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला…”

नक्की पाहा >> Photos : भास्कर जाधवांविरोधात भाजपा रस्त्यावर; पुण्यात केलं जोडे मारो आंदोलन

अखेर बरेच प्रयत्न केल्यानंतर राजेशर्के यांचा रत्नागिरी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क झाला. त्यांच्याशी संपर्क साधूून त्यांना सगळी माहिती दिली. त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलीस बोटीच्या सहाय्याने पोहोचल्यानंतर त्यांनी दुपारी अडीचच्या सुमारास सुटका केली. एसटी महामंडळाची ९ लाखांची रोकड वाचवल्याचं समाधान असलं तरी या पुरामुळे आगाराचे मोठे नुकसान झाल्याची खंत राजेशर्के यांनी व्यक्त केली.