संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रालाही करोना विषाणूचा फटका बसलेला आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर आघाडीवर आहे. प्रत्येक दिवशी महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत आहेत. खडतर परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि सर्व वैद्यकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधत, करोनावर सुरु असलेल्या सर्व उपचारांबद्दल माहिती दिली.

जनतेला उद्देशून केलेल्या या भाषणात उद्धव ठाकरेंनी डॉक्टरांचे आभार मानण्यापासून राज्यातील उद्योगधंद्यांपर्यंत सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अजुनही सर्व स्तरातून मदत येत आहे. मुख्यमंत्री निधीवरुन होत असलेल्या राजकारणात मला रस नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लहानग्या दोस्तांचं कौतुक केलं. “अनेक लहानगी मुलं आपल्या खाऊचे पैसे, सायकल घेण्यासाठी जमवलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहेत. हे पाहिल्यानंतर मला खूप बरं वाटलं. यासाठी सर्व लहानग्यांना माझे आशिर्वाद आहेतच. पण यावेळी मी या सर्व लहानग्यांना आश्वासन देतो की तुम्ही अजिबात काळजी करु नका. तुमचं भविष्य उज्वल व्हावं यासाठीच आता या उपाययोजना सुरु आहेत. परिस्थितीशी लढण्यासाठी आमची पिढी समर्थ आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी लहानग्यांचे आभार मानले.

अँटी करोना पोलीस संकल्पनेचंही केलं कौतुक –

काही दिवसांपूर्वी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या घरात आपला मुलगा व पत्नी करोनाविषय कसे जागृत आहेत याबद्दलचा एक व्हिडीओ टाकला होता. घराघरात स्वच्छतेबद्दल अशी जागरुकता पाळायला हवी असं आवाहन पाटील यांनी केलं होतं. उद्धव ठाकरेंनी या संकल्पनेचं कौतुक करत सर्व नागरिकांना अशाच पद्धतीने आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आतापर्यंत या विषाणूवर लस सापडलेली नसल्यामुळे…घरात राहून आपण याचा सामना करु शकतो असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.