Maharashtra Karnataka Border Dispute: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. अशातच आता बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना थेट फोन करून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत फडणववीसांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा – Maharashtra Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “ मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो, नाराजीदेखील व्यक्त केली, चिंताही व्यक्त केली आणि अपेक्षा व्यक्त केली की, तत्काळ यावर कारवाई झाली पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वास्त केलं, की तत्काळ कारवाई केली जाईल आणि जे लोक अशाप्रकारच्या घटना करत आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. याशिवाय त्यांनी हेदेखील मला आश्वास्त केलं की, याबाबतीत सरकार कोणालाही पाठिंबा देणार नाही. आता त्यांनी जे काही सांगितलेलं आहे, त्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. पण याचसोबत हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याही कानावर टाकणार आहे. कारण, आपल्याला विकासाकडे जायचं आहे. अशाप्रकारे राज्याराज्यांमध्ये असं जर वातावरण तयार होऊ लागलं तर हे योग्य नाही.”

हेही वाचा – बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, “ सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या संविधानाने कोणालाही कुठल्याही राज्यात जाण्याचा अधिकार दिलेला आहे. व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. राहण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे जर एखाद्या राज्यात याची पायमल्ली होत असेल, तर त्या राज्य सरकारने ते रोखण्याचं काम केलं पाहिजे आणि जर असं लक्षात आलं की राज्य सराकर रोखत नाही, तर निश्चित ते केंद्रापर्यंत घेऊन जावं लागेल. त्यामुळे आतातरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय ते घडतय की नाही हे आम्ही पाहतोय. यासोबत यासंदर्भातील सगळी माहिती ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत मी पोहचवणार आहे.” असंह फडणवीस यावेळी म्हणाले.